Sunday, 4 October 2020

सरंजामशाहीची अदृष्य नियमावली

♦️सरंजामशाहीची अदृष्य नियमावली 

इ.स.६ व्या शतकापुर्वी सामंतशाही तर इ.स.च्या ६ व्या शतकापासून सरंजामशाहीला सुरुवात होते. पहिली ही वरुन शोषणव्यवस्था, दुसरी खालून शोषणव्यवस्था. पहिल्या व्यवस्थेमध्ये शेतकरी महसूल प्रत्यक्ष राजाला देतो, दुसरी व्यवस्थेत मध्यस्थामार्फत म्हणजे जमिनदारामार्फत राजाला देतो.

सरंजामशाहीत सरंजामदार खेड्यातील मोठे जमीनदार असत आणि अनेक गावे त्यांच्या नियंत्रणात असत. ते वाडेकरी असत. ते सशस्त्र फौजसुध्दा बाळगत. त्यांचा छोटेखानी डामलौल अगदी राजासारखच असे.या वाड्याच्या पायरीला धर्मव्यवस्था सुद्धा लोटांगणे घालत असे. किंबहुना ते धर्मव्यवस्था आणि सरंजामीव्यवस्था एकमेकाला पूरक काम करत.

गावातील प्रमुख सणवार उत्सवात त्या सरंजामदाराचा पहिला मान असे. धर्मप्रमुख त्यांची मर्जी सांभाळत. त्याप्रमाणेच वागत. म्हणजे ब्राम्हणशाही आणि सरंजामशाही दोघे मिळून शोषण पिळवणूक करत असत.हि शोषण पिळवणूक गरिब शेतकरी यांच्यापासून ते भुमीहीन भटके विमुक्त किंवा गावकुसाबाहेरील तत्कालीन अस्पृश्य जातींपर्यंत होई.यात धर्मव्यवस्था धार्मिक लुट करे तर सरंजामशाही अवाजवी शेतसारा किंवा खंडण्या वसुल करे. 
या दोन्हीही व्यवस्था ग्रामीण जनतेवर कठोर नियमावली बसवून लक्ष ठेवत असत. 

या दोनही व्यवस्थेच्या नियमावल्या आपण समजून घेवून त्यावर उपाययोजना म्हणून त्या कोणत्या न  कोणत्या  मार्गाने सार्वजनिकरित्या मोडीत काढण्यासाठी कार्यरत असले पाहिजे.आज सरंजामीव्यवस्थेचे अवशेष (निम-सरंजामी) उच्चजातीयांनी विशेष प्रयत्न करुन मोडले पाहिजेत. त्या नियमवल्या सांभाळून कुठलाही बदल आपन करु शकत नाहीत.कुनाचेही भले होइल असे त्या नियमावलींत काहीही नाही.आपण जेव्हा आपल्या समस्यांचे खापर आप्तस्वकियांवर फोडतो तेव्हा त्या समस्यांना कुठलाही एक व्यक्ती जबाबदार नसतो तर समाजव्यवस्थेतील ही नियमावली, आणि ती चालवनारे त्यावर अंमल करणारे जबाबदार असतात.
एखाद्या सुनेला हुंड्यासाठी जाळून मारणे या घटनेचा निषेध करताना आपण जाळून मारणाऱ्या कुटुंबाला ज्या प्रमाणे बोलत असतो,शिव्या देत असतो, त्यात हे विसरतो की  ते कुटुंब स्त्रीला हिन,दुय्यम लेखनार्या सार्वजनिक नियमावलीत वावरत आसते. आजूबाजूला एक सुन जाळून मारलीतर काय दुसरी येइल असा प्रचार करणारी सरंजामी व्यवस्था किंवा मानसिकता कार्यरत असते.एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला जबाबदार धरुन चालनार नाही.अशा ज्या ज्या नियमावली आहेत,त्या मोडल्या पाहिजेत.माझ्या घरात आम्ही जातीभेद पाळत नाहीत असे ९९% लोक म्हणतात तरीही जातीव्यवस्था कशीकाय कार्यरत आहे,आजही मातंग पारावर आला म्हणून बाई असो किंवा लहान मुल असो त्यांना कठोर शिक्षा करणारी जात ही त्यांचीच आहे जे म्हणतात आमच्या घरात आम्ही जातीभेद अस्पृश्यता पाळत नाहीत.मग असे दुहेरी वर्तन का होते ? तर सार्वजनिकरित्या सर्वांनी मिळून ही सरंजामी नियमावली मोडलेली नाही.तसे जगजाहीर प्रयोग केलेले नाहीत.म्हणून सार्वजनिक जीवनात आपली पायरी बघुन न वागणाऱ्या माजी अस्पृश्य जाती किंवा भटक्या विमुक्तांना कठोर शिक्षेला सरंजामशाही आजही तयार आहे.

आत्ता सजातीय उदाहरणे बघा 
" मी खुप पुढे गेलो असतो पण भाऊकी आड आली." 
"मी प्रगती केली असती, पण भावाला माझे बघवत नाही. 
"मित्रांनी साथ दिली नाही."
"कोणी मदतीला आले नाही." 
वगैरे.हे व्यक्तिनिष्ठ आरॊप झाले.या गोस्टीला आजूबाजूला तिच सरंजामी नियमावली कार्यरत आहे.तीचा दबाव असल्यामुळे तुम्हाला आप्त किंवा मित्र धोका देताना योग्य वेळी मदतीला येताना दिसत नाहीत. पोडजात मोडुन लग्न करणे हे भाऊकीला मान्य नसते.त्यात तसे लग्न केलेल्या कुटुंबाला बहिष्काराला सामोरे जावे लागते. 
खरेतर, प्रस्थापितांची नियमावली पाळून समाजव्यवस्थेत बदल शक्य नाही.ती मोडली पाहिजे.सर्वांच्या भल्यासाठी.
म्हणून बरेच जन व्यक्तिगत जात पात लाळत नाहीत परंतू ते हे चांगले कृत्य  सार्वजनिक करत नाहीत.आमच्या नतलगात अंतरजातीय विवाह झालेला आहे हे सार्वजनिक कौतुकाने सांगण्याचे दिवस अजुन यायचे आहेत.त्याने तोंड काळे केले ही सरंजामी नियमावली आजूनही कार्यरत आहे.
कायद्याने सज्ञान असनारी मुलगी जोडीदार निवडून मुलासोबत लग्न करुन गेली तरी पळून गेली , तिच लफडं होतं असा प्रचार  करणारी नियमावली थांबवनारे धाडसी मताचे लोक  उभे करायचे आहेत. दलीतांची बाई सहज उचलून आनुन तिला ओरबडुन , रेप करताना तिने ओरडु नये म्हणून जिभ कापून किंवा पळून जावु नये म्हणून हात पाय मोडुन तिला हवे तेव्हा हवे तिथे फेकुन देता येते ही लोकशाहीतही स्वातंत्र्या नंतर वावरनारी सरंजामी मानसिकता सबकॉंसिअसली नेनीवेतून कार्यरत आहे. 
मनीषा वाल्मिकी प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी भरलेल्या जातपंचायती, " बघु कोण काय करतय आपल्याला " या सरंजामी मानसिकतेतून कार्यरत आहेत.
 

नितीन सावंत परभणी 
९९७०७४ ४१४२ 
दि.४ आक्टोबर २०२०

No comments:

Post a Comment