Wednesday, 29 June 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण 19 वे l वेदांचे जे मुळ

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण 19 वे 

 ll वेदांचे जे मुळ ll

अनादी निर्मळ वेदांचे जे मुळ l परब्रम्ह सोज्वळ विटेवरी ll
कर दोन्ही कटी राहिलासे उभा l निलवर्ण प्रभा फांकतसे ll
आनंदाचा कंद पाऊले साजिरी l चोखा म्हणे हरी पंढरीये ll
               - संत चोखोबाराय

                                        प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांच्या  स्वमुखातील अत्यंत गौरवशाली उद्गार आहेत. गौरवशाली यासाठी की ब्राम्हणी व्यवस्थेने ज्या जातींना हिन, अस्पृश्य , अपवित्र मानले होते, त्याच अस्पृश्य जातीतून आलेल्या चोखोबारायांनी सर्व चाकोऱ्या मोडत अत्यंत प्रतिकुल काळात विठ्ठलाचे वर्णन करणे क्रांतिकारी आणि गौरवशाली आहे. पंढरपुरातील बडवे ब्राम्हण, संत चोखोबारायांना सतत घालून पाडून बोलत असत.त्यांना जन्मानेच वाईट मानत असत. त्यांच्या तोंडवरच त्यांना  "महारा देव बाटवलास" म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत असत.ब्राम्हणांनी दिलेला हा त्रास संत चोखोबारायांनी आणि इतर संतांनी लिहुन ठेवला आहे.संत चोखोबाराय हे अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक जातींचे, त्या काळातील प्रतिनिधी होते. तर पंढरपुरातील बडवे हे विषमतावादी वैदिक श्रौतस्मार्त धर्माचे प्रतिनीधी होते.
                                        ब्राह्मणवर्ग स्वलिखीत धर्मग्रंथांच्या आधारे आपल्या देशातील फारमोठ्या वर्गाला माणुस म्हणून जगण्यास हक्क , अधिकार  दयायला तयार नव्हते. येथे शुद्र अतिशुद्रांना ज्ञानाचे, अभिव्यक्त होण्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते. कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना ' घोकावया अक्षर, मज नाही आधिकार' हे मनावे लागत असेल तर त्यांच्या आधी होऊन गेलेल्या संत चोखोबारायांचे काय हाल झाले असतील. त्यांना काय यातना भोगाव्या लागल्या असतील याचा अंदाजच आपण बांधु शकतो.
                  ज्ञान भांडाराच्या चाव्या स्वताच्या जानव्याला बंदिस्त ठेवणाऱ्या ब्राम्हणांना संत चोखोबारायांसारखे अस्पृश्य लोक जर ज्ञानाची अनुभुती देत असतील तर ते  तत्कालीन व्यवस्थेला  पचणारे असेल का ? तरिही कुनालाही न जुमानता सनातन्यांच्या नाकावर  टिच्चुन संत चोखोबाराय वैदिक सनातनी व्यवस्थेला तत्वीक उत्तरे देतात.ते डिबेट करतात. ते म्हणतात
" तुम्ही ज्या वेदांना प्रमाण मानता त्या वेदाचे मुळ आमचा विठ्ठल आहे. तो अनादी अनंतकाळापासुन आहे. हा आमचा विठ्ठल अगदी निर्मळ स्वच्छ भेदरहीत आहे "
                    विठ्ठलाला वेदांच्याही आधीचा म्हणून उभा करणे, किंवा, वेदांचे मुळच विठ्ठल आहे, ही मांडणी करणे संतांच्या रणनितीचा भाग आहे. वेदांच्या आधारे ब्राम्हण वर्ग स्वताला देवाचा प्रतिनिधी मानायला लागला होता.त्याद्वारे सर्वसामान्यांची लुट चालू होती. म्हणुन सर्वसामान्यांना स्वस्तातला, सहज उपलब्ध होणारा ईश्वर  विठ्ठल दाखवून शोषणकारी वैदिक व्यवस्था नाकारणे है संतीचे उ‌द्दिष्ट आहे. संत चोखोबाराय याद्वारे वैदिकांच्या वर्णश्रेष्ठत्वाच्या मांडणीला सुरंग लावतात.संत चोखोबाराय पुढे म्हणतात. "तो अनादी निर्मळ विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे. आणि त्याच्या तेजाची निळवर्ण प्रभा सर्वत्र पसरली आहे."
                     येथे संत चोखोबारायांचा विठ्ठल निलवर्ण आहे. गौरवर्णीय नाही.गौरवर्ण वैदिकांचा तर निलवर्ण द्रविडांचा, भारतीय भुमीपुत्रांचा आहे.
                               म्हणून विठ्ठल हे द्रविड , शेतकरी कष्टकरी काळ्यांचे अब्राम्हणी परंपरेचे प्रतिक आहे. वेदांचे मूळ असूनही, विठ्ठल वैदिकांचा नाही.त्यांच्या कुठल्याच मुख्य धर्मग्रंथात विठ्ठलाचे वर्णन नाही. या द्वारे संत ब्राम्हणी व्यवस्थेचा जाचक अन्याय नाकारून, अब्राम्हणी परंपरेचा सांस्कृतीक पर्याय उभा करत होते. म्हणून संत चोखोबारायांचे म्हणने आहे. " आमच्या आनंदाचे, उत्सवाचे प्रतिक पांडुरंग आहे. हा हरी, हे प्रतिक पंढरीचा पांडुरंगच, इतर ठिकाणचे दैवते नव्हेत "
                             अस्पृश्य मानले गेलेल्या संताने वेदांचे मुळ  पांडुरंग आहे, हे मांडणे , बोलुन दाखवणे , काव्यबद्ध करणे  दुर्लक्षून कसे चालेल.यद्वारे विठ्ठलाची उंची वाढवणारे महान काम संत चोखोबारायांनी केले आहे. वेदाचे मुळ विठ्ठलाला मानने, तोच वेदीपेक्षाही श्रेष्ठ, आनादी आहे, हे म्हणने.खऱ्या अर्थाने हे वैदिकांच्या हेकेखोरपणाला उत्तर देने आहे. कारण एक प्रश्न पडतो, तो असा की संत चोखोबारायांनी वेद वाचले असतील का? वैदिक तत्त्वज्ञान त्यांना श्रवण करायला तरी मिळाले असेल काय ? याचे उत्तर नाही असे द्यावे लागते. कारण अस्पृश्य  जातींना ज्ञानबंदी, स्पर्शबंदी होती. त्यामुळे संत चोखोबारायांना धर्मग्रंय पहायला किंवा ऐकायला सुद्धा मिळाले नसणार आहेत. कारण या धर्मग्रंथालील बोजड तत्वज्ञान नाकारणारा तसा त्यांचा एक अभंग आहे.

"आम्हा न कले ज्ञान, न कमे पुराण | वेदाचे वचन न कळो आम्हा ॥
आगमाची आठी, निगमाचा भेद | शास्त्रांचा संवाद न कने आम्हा ll
योग याग तप,अष्टांग, साधन । न कळेची दान, वृत्त तप ll
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा l गाईन केराबा नाम तुझे ll

                      " धर्मग्रंथातील शब्दीक बाष्काळपणाला संत चोखोबारायांनी स्पष्ट नकार दिला आहे.शब्दप्रमानाच्या जगातील , ब्राम्हणी परंपरेतील, वैदिक परंपरेतील काहीच नको म्हणत त्यांनी भक्तीला प्राधान्य दिले आहे.अर्थात वैदिक वर्ग समाजव्यवस्थेत वागताना जातीभेद, करत असेल, अस्पृश्यता पाळत असेल, तुसडेपणाने वागत असेल तर ते ज्या धर्मग्रंथांवर चालतात 'ते वाचायची गरज काय ? ही चोखोबारायांची भुमीका आहे. आम्हाला तुमचे काहीच नको , तुमच्या शब्दीक वैदिक ज्ञानपरंपरेपेक्षा आम्हाला विठ्ठलभक्ती परंपराच वंदनीय आहे. हा संत चोखोबारायांच्या मांडणीचा मध्यबिंदू म्हणावा लागेल आणि म्हणुन संत चोखोबाराय आपल्या भक्तीच्या जोरावर बाष्कळ पोथीपंडीतांची नियमावली ते नाकारतात.त्यांना तात्विक भाषेत च्यालेंज करतात.त्यांचीच खडिया त्यांच्यावर खडी करतात.तुमच्यापेक्षाही आमची परंपरा जुनी ग्रेट आहे.हे ते सांगतात.

नितीन सावंत परभणी
9970744142

Tuesday, 21 June 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण १८ वे चोखोबारायांच्या शिकवणुकीचा अन्वयार्थ

  संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण १८ वे 

चोखोबारायांच्या शिकवणुकीचा अन्वयार्थ .

                         संत चोखोबाराय गेले.नामदेवांनी त्यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या अगदी समोर बांधली.हे संत चोखोबारायांचे स्मारक मोठा गाजावाजा करून , सर्वांना सोबत घेऊन उभे केले होते. लोकांनी त्यातून काय धडा घ्यायला हवा होता? कशासाठी संत नामदेवांनी सर्व जातीचे संत एकत्र केले होते ? कशासाठी सर्व संत मंडळ चोखोबारायांच्या घरी जावून सहभोजन करत होते ? गोपाळकाला म्हणजे काय ? भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे काय. ?
                        आर्थात कुणीही भेदभेद करायची नाही. जातीव्यवस्था, अस्पृश्यता पाळायची नाही. सर्वांना समान लेखावे, मानावे आणि वागवावे.हा सर्वच संतांच्या शिकवणुकीचा मुख्य उदेश होता.चोखोबारायांच्या नंतर झालेल्या सर्वच संतांनी  देखील  चोखोबारायांचा अगदी आदरपूर्वक उल्लेख केला आहे. सर्वांना चोखोबाराय वंदनीय, पुजनीय वाटतात.
                        संत तुकोबाराय संत चोखोबारायांच्या बद्दल तर 'चोखा माझा गणपती' म्हणतात. संत तुकोबारायांनी आनखी एका अभंगात संत चोखोबारायांच्या बद्दल गौरवाने वर्णन केले आहे. ते असे.
चोख्याचे अभंग करविले देवानी | स्वप्नी ही येऊनी सांगितले।।
चोखोनिया म्हनोनी निंदतील कोणी । लागोणी बरे मजला गोणीन पहाती ॥
माझ्या चोखियाचे नित्य घेती नाव । त्याच्या घरी धाव जाय माझी ॥
तुका म्हणे चोखा युगायुगीचा भक्त । म्हणोनी पंढरीनाथ ऋणी त्याचा ॥"

चोखोबारायांच्या बद्दल निंदानालस्ती केलीत पहा ? ही तंबी देत ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' असेही तुकोबारायांनी स्पष्ट सांगिले आहे.
                             संत एकनाथ महाराजांनी चोखोबारायांच्या बद्दल अनेक अभंग लिहीले आहेत. इतर संतांपेक्षा संत एकनाथ महाराजांचे चोखोबारायांचा उल्लेख करणारे सर्वात जास्त अभंग आहेत. संत एकनाथ महाराजांवर संत चोखोबारायांचा मोठा प्रभाव होता. म्हणुनच संत एकनाथ महाराजांनी पैठण परिसरात अस्पृश्यता निर्मूलनाचे अनेक प्रयोग केले होते. आपल्या घरी पितर भोजनाच्या पंगतीत त्यांनी अस्पृश्यांना जेवू घातले होते. एकनाथ महाराजांनी तर इंद्र दरबारातील नासलेले, सडलेले आमृत चोखोबांची दृष्टी पडताच शुद्ध झाल्याचे अभंगातून वर्णन केलेले आहे.
                               ही संत मंडळी समतेचा अग्रह धरत चोखोबारायांना प्रतिक म्हणुन उभी करत होती. कुणी भेदाभेद करू नये, ईश्वर भेदाभेद करत नव्हता. संत भेदाभेद करत नव्हते हा वारेकरी सांप्रदायाचा महत्त्वाचा भाग होता.आणि संत चोखोबाराय या समतेच्या मांडणीसाठी संतांनी प्रतिक बनवले होते.
                              या शिकवणुकीचा समाजमनावर काही फरक पडला की नाही ? भेदाभेद मानू नये, ईश्वराच्या दारात कुणीही लहानमोठा नसतो, देव सर्वांचाच, सगळ्यांसाठी सारखाच ही शिकवण समाजमनात रुजली की नाही?
                                          याचे उत्तर जड अंतकरणाने नाही असे द्यावे लागते.जातीभेद विरहीत एकच गाव संताना वसवण्यात यश आले. ते गाव म्हणजे पंढरपूर होय.गावगाड्यात संतांच्या स्वप्नातील समता पोहंचू शकली नाही.आज घडीला महाराष्ट्रातील सर्व वारकरी पंढरपुरात  एकत्र आले की, जातीभेद करत नाहीत, अस्पृश्यता पाळत नाहीत.कुनाची जात विचारत नाहीत.ते एका ताटात जेवतात, एकमेकांना अलिंगण देतात, एकमेकांच्या पाया पडतात, परंतु हेच वारकरी गावाकडे गेले की पुन्हा नित्यनियमाप्रमाणे जातीभेद, अस्पृश्यता पाळतात. जातीभेद विरहीत आदर्श समाजाचे एक स्वप्न संतांनी पाहिले होते त्या स्वप्नाला वारक-यांनी पंढरपुरापुरतेच ठेवले. आणि चोखोबारायांचे काय झाले ?  भालचंद्र नेमाडे म्हणतात.
                                     " बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्याची वारकऱ्याना पर्वा नाही आणि भरकटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठल भक्त चोख्याला प्रतिगामी ठरवलेले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतानाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते. परंतु केवळ स्वतःच्या आविष्कार सामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत पाठबळ लाभलेले दिसते"

                          एकटा चोखोबा तेवढाच वारकऱ्यांच्या दृष्टीने माणुस ठरला आहे. बाकी अस्पृश्य मात्र माणुस म्हणुन गणले गेले नाहीत.चोखोबारायांनी अस्पृश्यता अमानवीय असे सांगुनही, तुकोबाराय यांनी भेदाभेद मानू नका असे सांगूनही, संत एकनाथ महाराजांनी भेदाभेदाच्या विरोधात काम करूनही, वारकर्यांनी मात्र दैनंदीन जीवनात, गावपातळीवर अस्पृश्यता, भेदाभेद चालूच  ठेवला आहे. २०१९ साली विदर्भातील आर्वी या गावी माजीअस्पृश्य जातीतला मातंग  समाजाचा ८ वर्षाचा मुलगा मंदिरात गेला म्हणुन, त्याला भर दुपारी गरम स्टाईलच्या फरशीवर एसिड टाकून बसवण्यात आले होते. मातंग समाजील या मुलावर मंदिर बाटवल्याचा आरोप करण्यात आला होता. अशीच घटना लातुर जिल्ह्यातील सरपंच असणाऱ्या मातंग समाजाच्या महिलेलाही मंदिरात का गेल्या म्हणुन नवरदेव असणाऱ्या त्या महिलेच्या मुलासह दोघांनाही गावगुंडांनी मारले होते. जळगाव जिल्ह्यातील अस्पृश्याची मुले विहीरीत का पोहली म्हणून त्यांना उघड़े नागडे करून शेतातून गावापर्यंत मारत आनले गेले होते. या सर्व घटना २०१९ च्या आहेत. याही अगोदर परभणी जिल्हयातील देशमुख पिंप्री या गावी तर पाऊसात मंदिराच्या आडोशाला उभे असलेल्या आंबादास सावणे या बौद्धाला ठेचून मारण्यात आले होते. तो मंदिरात सुद्धा गेला नव्हता.
                            आशा अनेक घटना आजही मनाला व्याकुळ करतात. चोखोबारायांना न्याय मिळाला का हा प्रश्न पुन्हा उद्भवतो. त्यांनी लिहीलेले अस्पृश्यतेचे अभंग फक्त गाथ्यापुरतेच ठेवले जातात का ? सर्वांच्या आधी चोखोबारायांनी सामाजीक समतेचा अग्रह धरूनही हा चोखोबा रस्त्यावरच तिष्ठत उभा ठेवण्यात आला आहे. त्याची स्वतंत्र अशी भव्यदिव्य , मंदिरे, सभागृह, मंगलकार्यालये, इमारती, वास्तू तुम्हाला कुठेही दिसनार नाहीत.काही अपवाद वगळल्यास चोखोबारायांच्या वाट्याला मरनोत्तरही वाळीत टाकलेलेच भोग आले आहेत. शेवटी चोखोबायांसह त्यांच्या कुटूंबीयांनी नेमाडे म्हणतात त्या प्रमाणे

" सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य,
परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे ईशारे देऊन ठेवले."

                            या संदर्भात संत चोखोबारायांचा सखोल अभ्यास करूनच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले की या वारकरी भक्तीमार्गाने आपला उद्धार होने शक्य नाही. म्हणुनच त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद न माननाऱ्या बौद्ध धम्माचा पर्याय निवडुन सर्वच अस्पृश्यांना गुलामगीरीतून मुक्त केले.वारकरी , भागवत धर्माने व्यवहारात समता आनली असती तर आज घडीला हजारो माजी अस्पृश्य जाती वारकरी , भागवतधर्मी दिसल्या असत्या.

                                आपल्या आजुबाजुला संतांच्या मेळ्यात वावरलेल्या चोखामेळ्याला ग्रामीण जातीग्रस्त समाजमनाने स्विकारले नाही. अस्पृश्यता पाळायची नाही हे चोखोबारायांच्या संत चरित्रावरून तरी लोकांनी ठरवून टाकायला हवे होते. पण समाजाला 'तसे करावेसे वाटले नाही, जो जातीग्रस्त समाज चोखोबारायांचे, तुकोबारायांचे ऐकत नाही तो आपले काय ऐकेन या भुमीकेतून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला होता.                 
                                     आतातरी ग्रामीण समाजाने संत चोखोबारायांना न्याय दयावा. संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज सांगतात त्याप्रमाणे जातीभेद करू नये. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर ही शिकवण सर्वांनी 'आचरणात आणावी आपल्या अवतीभोवती कुणालाही भेदाभेद करू देऊ नये. सर्वांना माणुस म्हणून वागवावे. हिच चोखोबारायांना खरी श्रद्धांजली ठरेल.

नितीन सावंत परभणी
9970744142

Sunday, 19 June 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण १६ वे संत सोयराबाई आणि संत कर्ममेळा

 संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण १६ वे 
संत सोयराबाई आणि संत कर्ममेळा

आमची तो दशा विपरीत झाली। कोण आम्हा घाली पोटामध्ये ll  आमचें पालन करील बा कोण l तुजविण जाण दुजे आता ।l कळेल तें करा तुमचे उचित l माझी तो नित निवेदली ||
सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही । आणिक तो आम्ही कोठे जावे ।।
                    -   संत सोयराबाई 
                        
                          संत चोबोबारायांच्या मृत्यू पश्चात आपल्या कुटूंबाची काय दशा झाली आहे, ते या अभंगात सोयराबाईनी मांडले आहे. त्यांचा मुलगा आणि कर्ममेळा अगदी पोरके झाले होते. संपूर्ण कुटूंब रस्त्यावर झाले होते. म्हणुन सोयराबाई म्हणतात, चोखोबारायांच्या जाण्याने आमची दशा विपरीत झाली आहे. आता आम्हाला कोण पोटासी घेईल ? आमचे पालन पोषण कोण करील ?. अत्यंत हृदयद्रावक आर्त अशी वेदना या भंगातून सोयराबाईनी मांडली आहे. 

                     सोयराबाईचे एकुण ६२ अभंग उपलब्ध आहे. तर कर्ममेळा यांचे २६ . या दोघा मायलेकरांचा सर्वात मोठा आधार चोखोबाराय होते. या दोघांच्या एवढ्याच तोकडया अभंगांवरून आपल्याला इतिहासाच्या धुंडाळा घ्यायचा आहे.संत सोयराबाई संत , कर्ममेळा यांचे बहुतंश अभंग नष्ट केले गेले आहेत.आज उपलब्ध असलेल्या या थोड्या का होइना अभंगांवरून सोयराबाई आणि बंका यांची माहिती घेऊया.
                        सोयराबाई ह्या  संत चोखोबारायांच्या खांदयाला खांदा लावून साथ सहयोग देणाऱ्या पत्नी होत्या. त्यांनी आपली ननंद निर्मळा हिच्याशीही युष्यभर अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले होते. आपल्या नवऱ्याला बडव्यांनी त्रास दिल्यानंतर त्यांनी विठ्ठलाला लाज वाटावी असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
"खाईले जेविले त्याचा हा उपकार l दुबळी भ्रतार मारू पाहाशी "
                   आमच्या घरी खाल्लेल्या अन्नाला तरी जाग. या दुबळीचा नवरा मारू पहातोस काय ? हा थेट सवाल सोयराबाईनी विठ्ठलाला विचारलेला आहे. प्रत्येक वेळी त्या आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. सर्व संत मंडळ आणि नामदेव चोखोबारायांना भेटायला आल्यानंतर सोयराबाईनी सर्वाना जेवायला घातले. चोखोबाराय गेल्यानंतर त्यांच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला होता.  पण नामदेव महाराज चोखोबारायांचे स्मारक बांधत आहेत म्हटल्यानंतर त्या सुखावल्या होत्या. समाधी बांधल्यानंतर त्या आपल्या गावी निर्मला आणि बंका यांच्याकडे गेल्या. कर्ममेळा भाणि सोयराबाई मेव्हणपुरीला जावून राहिल्या होत्या. 
                           कर्ममेळा हे चोखोबारायांपेक्षा विद्रोही मानले जातात. सर्वच लेखक साहित्तीकांनी परखड व्यक्तीमत्व म्हणून  कर्ममेळा यांचा गौरव केला आहे.त्यांचा हा अभंग अत्यंत चर्चीला गेलेला आहे.

आमुची हिन केली याती l तुज का न कळे श्रीपती॥ 
जन्म गेले उष्टे खाता । लाज न ये तुमचे चित्ता ॥ 
आमचे घरी भात दही । खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥ 
म्हणे चोखियाचा कर्ममेळा l कासया जन्म दिला ll 

                पांडुरंगाच्या माध्यमातून प्रस्थापीत समाजववस्थेची लाज काढणारा हा अभंग आहे. आमुचे आयुष्यच तुमचे उष्टे, खरकटे खाण्यात गेले आहे.तुमच्या जीवाला थोडीतरी लाज वाटते का ? असा विद्रोही सवाल संत कर्ममेळा यांनी विठ्ठलाला उपस्थित केला आहे. हा प्रश्न सर्व समाजव्यवस्थेने समजून घ्यायला हवा होता. निदान महाराष्ट्रातील सर्व वारर्यांनी तरी संत चोखोबारायांच्या आणि कर्ममेळा यांच्या वारकरी परंपरेतील योगदानाला लक्षात घेवुन नंतर कोण्याही अस्पृश्य व्यक्तीला सडके कुजके उष्टे उरलेले शिळेपाके द्यायला नको होते . स्वातंत्र्य मिळेपर्यंत, माजी अस्प्रश्य जातींना, भटक्या विमुक्त जातींना उरलेले, सडके, कुजके , नासके, उष्टे, खरकटेच खायला दिले गेले आहे. आजूनही भटक्या विमुक्त जातीच्या वाट्याला हेच जगणे आहे. म्हणून चोखोबारायांपेक्षा पुढची प्रकार भुमीका कर्ममेळा यांनी घेतली होती. दुदैवाने त्यांचे संपूर्ण अभंग आज उपलब्ध नाहीत.
                             त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेता, लाज काढण्यापर्यंत जाने पुरेसे आहे. संत कर्ममेळा यांची ही भूमिका  विषमतावादी विचारप्रवाह नाकारणारा मोठा विद्रोहच आहे. 
                             निर्माळा आणि बंका यांनाही इतिहासात अजरामर होत आले, ते चोखोबारायांच्या नामदेवांच्या सहवासामुळे.  निर्मला ही चोखोबारायांची बहीन तर बंका हे मेव्हणे होते. संत बंका यांचे ४१ तर निर्मळा यांचे केवल २४ अभंग आज उपलब्ध आहेत. या दोघेही पती पत्नीने आपल्या अभिव्यक्तीचे श्रेय चोष्योबारायांना दिले आहे.एवढे एकात्म कुटूंब दुसरीकडे सापडणार नाही. 

                          ही संत मंडळी जेव्हा अभंग रचत असत,त्या स्वलिखीत अभंगाला संत मंडळात सादर केले जाई. तेव्हा ऐकणारी जनता तो अभंग पाठ करून ठेवत असत.म्हणून तर आजही अनेक संतीचे अभंग गाथ्यात नाहीत पण लोक नेहमी म्हणतात असे आपल्याला निदर्शनास येईल. संत चोबारायांची अभंगगाथा सर्वप्रथम स.भा कदम यांनी उजेडात आली. त्या गाथेचे नंतर भालचंद्र नेमाडे यांनी संपादन केले. आहे. चोखोबारायीचे संपूर्ण कुटूंब निरक्षर मग हे अभंग कुणी उत्तररून घेतले ?  लिहुन घेतले?

                    अनंतभट हा चोखोबारायांचा लेखक. ब्राम्हण असुनही कुणाचीही पर्वा न करता एका अस्पृश्य संताचे अभंग शब्दबध्द, अक्षरबध्द करण्याचे काम अनंतभट्ट यांनी केले होते. कोण कोणत्या संताचा लेखक कोण कोण होते,  याबददल संत जनाबाईचा अभंग पुरावा मानला जातो.
                     संत जनाबाई म्हणतात. 

ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा । चिदानंद बाबा लिही त्यास ll  निवृत्तीचे बोल लिहीले सांगावे | मुक्ताईची वचने ज्ञानदेव ।l चांग्याचा लिहीणार शामा तो कासार । परमानंद खेचर लिहीत असे ll
सावत्या माळ्याचा काशीबा गुरव l कुर्म्याचा वास्तुदेव काईत होता ll
 चोखामेळ्याचा अनंतभट अभ्यंग | म्हणोनी नामयाचे जनीचा पाडुरंग ॥"

                           याद्वारे चोखोबारायांचे अभंग उतरून घेण्याचे  पहिले श्रेय अनंत भट यांच्याकडे जाते. चोखोबारायांची भाषा त्याकाळातील ग्रामीण बोली होती. ती बोली अनंतभट यांनी आपल्या शब्दात शब्दबद्ध केल्याचे अभंगांवरून लक्षात येते. 

                           त्या काळी चोखोबारायांच्या जीवावर उठलेले लोक पहाता, अनंत  भट यांनाही खुप त्रास दिला असणार आहे. तरीही अनंत भट यांच्या धाडसी कृतीमुळेच संत चोखोबारायांसह त्यांचे संपूर्ण कुटूंब इतिहासाच्या पटलावर अजरामर झाले. नामदेवादी संत मंडळींच्या शिकवणुकीतून अनेक लोक भेदाभेद मोडयला पुढे आले होते . हे संतांच्या कार्याचे यशच म्हणायला हवे.

नितीन सावंत परभणी 
9970744142

Friday, 17 June 2022

संत चोखोबाराय चरित्र - प्रकरण १७ वे संत चोखोबारायांच्या साहित्यातील मिथके

 संत चोखोबाराय चरित्र - प्रकरण १७ वे 

संत चोखोबारायांच्या साहित्यातील मिथके

                           भारतीय इतिहास हा संघर्षाचा, द्वेताचा इतिहास आहे. प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील या द्वैताचे विभाजन वैदिकी श्रृती विरुद्ध तांत्रिकी श्रृती असे करतात. भारतात वैदिकीचा इतिहास लिखीत स्वरूपात आला तर तांत्रिकीचा इतिहास अलिखीत स्वरूपात लोककला, परंपरा, उत्सव आणि मिथकांच्याद्वारे आला. भारतात ब्राम्हण सोडून इतरांना लिखानाचे अधिकार नसल्यामुळे शुद्रातिशुद्रांनी आपला इतिहास पिढीदर पीढीगत मौखीकरित्या जपला. हा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास होत असताना त्याला अनेक चमत्कारांच्या छटा लागल्या किंवा काही वेळेला लावल्याही गेल्या. माणसाने गुढ,अगम्य, चमत्कारीक कथांचा वापर आपल्या अभिव्यक्तीसाठी केला होता. याच अलौकिक गूढ, अवैज्ञानिक, चमत्कारीक कथांना मिथके असे म्हणतात. ही मिथके संत साहित्यात आहेत. संत साहित्यात अनेक चमत्त्कारीक कथा आहेत. या चमत्कारीक कथांचे अर्थात मिथकांचे सर्वहरांच्या,  शुद्रातिशुद्रांच्या सभ्यतेवर लाखो उपकार आहेत. कारण या चमत्कारीक कथा अर्थात मिथके निर्माण झाली नसती तर सर्वहरांचा, शुद्रातिशुद्रांचा इतिहास जपलाच गेला नसता. त्यामुळे चमत्कारीक कथा टाकावू नाहीत. साहित्यात, इतिहासात आलेले चमत्कारांचे वर्णन अभ्यास विषय आहे. तो नाकारून चालणार नाही. संपूर्ण संत साहित्य चमत्कारीक कथांनी गच्च भरलेले आहे. या चमत्कारांचा , मिथकांचा उलगडा करून, प्राप्त परिस्थितीचा विचार करून , अन्वयार्थ लावायचा असतो. ते मिथक का निर्माण झाले याचा शोध घ्यायचा असतो. किंवा मिथकातून कुठला म्यासेज पास केला गेला आहे, तो धागा पकडून निष्कर्ष मांडायचे असतात. वारकरी परंपरेत एकेका संताने आपल्या समकालीन किंवा भुतकालीन संताच्या नावे अनेक मिथकीय कथा निर्माण करुन ठेवलेल्या आहेत. त्या कथा वैज्ञानिक कसोट्यांवर किंवा नास्तिकतेच्या कसोट्यांवर पडताळून पहाता येनार नाहीत.किंवा अवैज्ञानिक आहेत म्हणून टाकुन देता येनार नाहीत.तर त्याचा अन्वयार्थ लावावा लागेल.
                            सध्याला आपल्याला पहायचे आहेत संत चोखोबारायांच्या साहित्यातील मिथके. या मिथकांचा उलगडा करताना, वास्तवाच्या सर्वाधीक जवळचा निष्कर्ष आपल्याला मांडायचा आहे. त्यामुळे चोखोबारायांच्या साहित्यात संत नामदेवांनी वर्णन केलेले एक दोन महत्त्वाची मिथके आहेत. त्यात पहिले मिथक असे की संत चोखोबारायांनी विठ्ठलाला दही पाजल्याचे वर्णन आहे. त्या अभंगाची सुरवात अशी आहे की, 
 
चोखामेळ्याने पाजियेलें दहीं। पडों दिले नाही उणे त्याचे ||१||
तयाचे चरित्र परिसावे सादर | करितो नमस्कार संत जना ||२|| "
                        या अभंगात संत चोखोबारायांकडे विठ्ठल दही खायला यायचा या प्रकारचे वर्णन आहे.हे मिथक अनेकांनी आजतागायत  पिढीदरपिढीगत सांगितले आहे. अनेक संतांनीही वर्णन केले आहे. त्यामुळे या मिथकावर चर्चा होने महत्त्वाचे आहे।

                          गोष्ट अशी होती की 'संत चोखोबारायांना पंढरपुरातील सनातनी ब्राम्हण वर्ग कोण्या न कोण्या कारणाने मारत होता, सतत त्रास देत होता. सनातनी कर्मठ ब्राम्हणांनी  चोखोबारायांना चंद्रभागेच्या पलिकडे हकलून दिले होते. तिथेही सर्व संत चोखोबारायांना भेटायला जायला लागले होते. उत्सव साजरा करायला लागले होते. हे सर्व पुन्हा सनातनी ब्राम्हणांना बघवले नाही. त्यांनी चोखोबारायांवर पुन्हा देव बाटवल्याचा आरोप लावून बैलाला जुंपून ओढण्याची शिक्षा सुनावली. तेव्हा लोकं विचारू लागले की चोखोबाराय तर नदीच्या पलीकडे रहातात. मंदिरात येऊन देव बाटवतील कशे? ब्राम्हणांच्या करस्थनाला आध्यात्मिक  भाषेत उत्तर देताना संत नामदेव, संत सोयराबाईंनी प्रचार केला की ब्राम्हण मंदिरात येवू देव नाहीत म्हणून पांडुरंगच संत चोखोबारायांच्या हताने दही खायला येतो. संत सोयराबाई सुद्धा म्हणाल्या आहेत.
                      
            खाईले जेविले त्याचा हा उपकार | 
            मज दुबळीचा भ्रतार मारू पहाशी ||
            
                         संत चोखोबारायांचे महत्व वाढवण्यासाठी संत मंडळातील संतांनी या प्रकारे प्रचार केला की जरी विठ्ठल मंदिरात चोखोबाला येवु दिले जात नसेल, परंतू भक्तिभावाचा भुकेला विठ्ठल मात्र स्वतः चोखोबाच्या घरी अस्पृश्याच्या हातचे जेवन जेवतो.देवाला अस्पृश्यांच्या घरी जेवायला पाठवनारे संत एका समतेच्या विश्वाची कल्पना जगासमोर ठेवत होते.देव जातीभेद करत नाही तर तुम्ही जातीभेद का पाळता ?  हा या कथेचा अन्वयार्थ. 
                               पुढील काळात झालेल्या अनेक संतांनी या मिथकाचा स्विकार केलेला आहे. संत तुकोबारायांनी सुद्धा 'उंच नीच कांही नेने भगवंत' या अभंगात विठ्ठल चोखामेळ्यासंवे ढोरे ओढी असा उल्लेख केला आहे. पंढरपुरचा पांडुरंग संत चोखोबारायांच्या संगे गुरेढोरे चारायला नेतो. वरील दोनही मिथकांचा संदेश संत या प्रकारे देतात की "ईश्वर भेदाभेद करत नाही, देवाला अस्पृश्यता मान्य नाही " म्हणुन देव चोखोबारायांच्या घरी जावून दही खातो, त्यांचे गुरे ओढतो. वैदिक छावणी, ब्राम्हण मंडळी जेव्हा धर्मग्रंथ लिहून शुद्रातिशूद्रांना हक्क अधिकार नाकारत होती, तेव्हा संतांनी ईश्वर भेदाभेद करत नाही, तो अस्पृश्यता पाळत नाही मग तुम्ही कोण लागून गेले दलाल ? हा प्रश्न उपस्थित केला होता. ब्राम्हणी छावणीच्या भेदाभेदाच्या नियमावलीला उत्तर देण्यासाठी संतीनी जानिवपूर्वक मिथके जन्माला घातली होती. ईवर भेदाभेद मानत नाही, भेदभेद तुम्ही करता ही संतांची मांडणी होती.त्यासाठी त्यांनी देव कामे करतो , शेनाच्या गवर्या लावतो , भक्तांच्या शिव्या खातो , स्त्रीवेशात अस्पृश्य घरी बाळंतपण करायला जातो.याप्रकारची मिथके जन्माला घातली गेलीत. 
                    संत नामदेव यांनी संत चोखोबांच्या स्त्रीच्या बाळंतपणाला पांडुरंग जातो.या पध्दतिचे वर्ण करणारा अभंग लिहीला आहे. संत नामदेव यांनी
                    
"चोखोबाची कांता असे ती गर्भिण|
झाले तीस पूर्ण नव मास ||"

                         या स्वरूपाची कथा आपल्या अभंगातून व्यक्त केली आहे. हा अभंग अत्यंत विस्ताराने लिहीलेला आहे. या अभंगाचा सारांश असा की

                              'संत सोयराबाईंच्या, बाळीतपणाचे दिवस निकट आलेले आहेत. सोयराबाई चोखोबारायांना निर्मळा यांना बाळांतपणासाठी आनायला पाठवतात. तेव्हा चोखोबाराय आपली बहिन निर्मळा यांना आणण्यासाठी मेहूणराजाला जातात. तर इकडे चक्क पांडुरंग चोखोबारायांच्या बहिणीचे रूप घेऊन सोयराबाईचे बाळीतपण करतो"
                            अशी कथा संत नामदेवांनी लिहीली आहे. यात विठ्ठलाने स्त्रीरूप धारण करून केलेल्या बाळंतपणात संत कर्ममेळा जन्माला आले.

                            या मिथकातून जो संदेश नामेदव महाराज देवु पहातात तो अप्रतिम आहे. स्त्रीचे बाळंतपण विटाळ मानला जातो. ब्राम्हणी संस्कृती बाळतपणाच्या काळात विटाळ पाळते. तर अस्पृश्यता सुध्दा विटाळग्रस्तच ! संत नामदेव महाराज एक अस्पृश्य स्त्रीचें बाळंतपण पांडुरंगाने केले हे सांगून दोनही प्रकारचा विटाळ धुडकवून लावतात. आमचा पांडुरंग कुठलाच विटाळ पाळत नाही. तसा विटाळ कुनीही पाळू नये हा संत नामदेवांचा संदेश आहे, आजही लोक या कथा जशाला तशा घेतात.पण त्यातील महत्त्वाचा संदेश दुर्लक्षीत करतात. स्त्रीबाळंतपण आणि अस्पृश्य स्त्रीची अस्पृश्यता नाकरणारे दोनही विटाळ विठ्ठल धुडकावून लावतो. हे संत नामदेव एक मिथकाच्या द्वारे सांगतात. 

                                संत नामदेवांपासुन पुढील काळातील सर्वच संत या कथांच्या द्वारे बंधुभाव, समता या तत्त्वाचा प्रचार करत होते. भेदाभेद, अस्पृश्यता पाळू नये हे सांगण्यासाठी त्यांनी पांडुरंगाचा आधार घेतला होता. 
                                
                              एका मिथकात तर चंद्रभागेच्या तिरावर गर्दीतून जाताना विठ्ठल म्हनतो की मला शिवु नका .लोक म्हणतात का शिवु नये तर विठ्ठल म्हनतो मला संत चोखोबाचे सुतक आहे.याही प्रकारचे एक मिथक आहे.अस्पृश्य संताच्या मृत्यूचे सुतक पाळणारा विठोबा होता.इतका ग्रेट संदेश हे मिथक देते. 
                               एक कथा तर अशी आहे की , एकदा इंद्र दरबारातील अमृत नासले.इंद्र नासलेल्या अमृताचा कलश घेवुन स्वर्गातील ब्राम्हा , विष्णु आदिंकडे जावुन आला.सडलेले अमृत शुद्ध करुन द्या म्हणून इंद्र सर्वत्र फिरत शिवाकडे गेला.शिव म्हनाले की कलयुगात विठ्ठल सर्वश्रेष्ठ दैवत आहे.तेच तुझ्या समस्येचे निराकरण करतील.इंद्र स्वर्गातून पंढरपुरी विठ्ठलाकडे आला . विठ्ठल म्हनाले चंद्रभागेच्या पलीकडे चोखोबा नावाचा माझा भक्त रहातो तो तुझे अमृत शुद्ध करुन देइल.इंद्र चंद्रभागेच्या पलिकडे चोखोबांच्या झोपडी समोर येवुन उभा राहिला.आवाज दिला.संत चोखोबाराय झोपडी बाहेर आले.त्यांची दृष्टी इंद्राच्या हतातील अमृत कलशावर पडली.आणि चोखोबारायांच्या भक्तीच्या , प्रेमाच्या, समतेच्या एका दृष्टीक्षेपाने कलशातील सडलेले अमृत शुद्ध झाले.स्वर्गाचा राजा इंद्र अस्पृश्य संताच्या पाया पडुन स्वर्गी निघून गेला. 
                               यातील मिथककर्त्याच्या कल्पनेला दंडवत केला पाहिजे.मिथकातून काय संदेश दिला गेला आहे.तर वैदिक धर्मीयांचे , इंद्राच्या संस्कृतीचे तत्वज्ञान सडले आहे.कुजले आहे.ते तत्वज्ञान एका वर्गापुरते बंदिस्त झाले आहे.हे अमृतरुपी ज्ञान सर्वांना न खुले केल्यामुळे त्याचा वास सुटला आहे.परंतू कलयुगात विठ्ठलाच्या संतांनी नवा भक्तिमार्ग खुला करुन , बंदिस्त  अमृतरुपी ज्ञान सर्वांना खुले केले.चोखोबासारख्या एका अस्पृश्य संताने अनादी निर्मुळ वेदांचे ते मुळ l परब्रह्म सोज्वळ विटेवरी ll म्हनत इंद्राचे अमृत तात्विक पातळीवर शुद्ध करुन दिले. त्यामुळे अमृत शुद्ध करणारा एक अस्पृश्य संत दाखवणे अत्यंत ग्रेट बाब आहे.त्यातल्या त्यात देवांच्या राजा अस्पृश्य संताच्या दारात उभा करणे हे तर फारच महत्वपूर्ण आहे. 

                                 म्हणून या मिथककथा समतेचा संदेश देण्यासाठीच निर्माण झाल्या होत्या. वैदीकांचे, ब्राम्हणांचे कायदेग्रंथ जातीव्यवस्था, अस्पृश्यता पाळयला लावतात तर संतांच्या मिथककथा समतेचा आग्रह धरतात. वारकरी चळवळीतील मिथके १) माणुसकी शिकवणारी २) कार्य हाच ईश्वर सांगणारी ३) आईवडीलच देव हे शिकवणारी ४) मोक्ष पुनर्जन्म नको भक्तीतच राहू दे सांगणारी आणि ५) सर्व काही विठ्ठलच हे सांगणारी आहेत. अशी पाच प्रकारची मिथके संपूर्ण संत साहित्यात जागोजागी सापडतील. ही मिथके, न अभ्यासता दूर लोटणे म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास स्वता पाण्यात बुडवण्यासारखे होईल. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

संत चोखोबारायांचे जीवनचरित्र प्रकरण १५ वे ll ऐसा आनंद सोहळा ll

 संत चोखोबारायांचे जीवनचरित्र 
         प्रकरण १५ वे 

                    ll  ऐसा आनंद सोहळा  ll 

ऐसा आनंद सोहळा । निर्मळा पाहे आपुले डोळा ll
आनंद न माय गगनी । वैष्णव नाचती रंगणी ॥ 
जेथे नाही भेदाभेद । अवघा भरला गोविंद ॥
तया सुखाशी सुखराशी | वोळली ती निर्मळेसी ll 
सोयरा देखोणी आनंदली । वेळोवेळी विठु न्याहाळी ॥
                   - संत सोयराबाई 

                  मंगळवेढ्याच्या वेशीत संत चोखोबाराय गेले. याचे दुख: सर्वांनाच झाले होते.संत सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा पोरके झाले होते. पण नामदेवांनी त्या कुटूंबाचे सांत्वन केले. त्यांना धिर दिला. चोखोबारायांची बहिण निर्मळा आणि मेव्हणा बेका यांना निरोप पाठवून पंढरपुरला बोलवून घेतले गेले.तोपर्यंत संत नामदेव यांनी ग्रामीण भागातील अनेक लोक, संत, महात्मे जमवून चोखोबारायांच्या अस्थी मंगळवेढ्यातून भजन करत पंढरपुरात आनल्या. एवढ्या जनसमूहाच्यासह पालखीत संत चोखोबारायांच्या अस्थी आल्याचे बघुन संत सोयराबाई, संत कर्ममेळा भारावून गेले.अस्पृश्याला कुठे कोण वाली असतो ?  येथे मात्र संत नामदेवांनी मोठा जनसमुदाय जमवून चक्क  संत चोखोबारायांची समाधी बांधायला घेतली होती.मनुस्मृती या ब्राम्हणी कायद्याप्रमाणे अस्पृश्यांची समाधी बांधायची नसते किंवा त्याला देव तथा पूजनीय बनवता येत नाही. संत नामदेव वर्णाश्रम धर्मीयांचा कायदा मोडीत काढुन , चोखोबारायांची समाधी उभारत होते.त्यामुळे ही घटना काही साधारण नव्हे.आणि इतिहासात एका अस्पृश्याचे स्मारक पहिल्यांदाच होत होते.या बद्दल त्या कुटुंबाला अत्यंत आनंद झाला होता .सोयराबाईनी अभंग लिहून हा आनंद व्यक्त केला आहे. या समाधी सोहळ्याला निर्मला बंका ही जोडीही हजर आहे. निर्मळा म्हणजे चोखोबारायांची बहीण तिच्या डोळ्यासमोर समाधी सोहळा होतो आहे.तिचाही आनंद अवर्णनीय आहे. सर्वांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. आपल्या घरच्या व्यक्तीचे कायमस्वरूपी स्मारक होत आहे ही त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब होती.  
                   
                        संत सोयराबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे या समाधी सोहळ्याला कुठलाही भेदाभेद न करता, सर्व जनता दादीवाटीने उभी होती. पतका आकाशात झुलत होत्या. हा सोहळा सोयराबाईंच्या कुटुंबालाच तेवढा आनंदयायक नव्हता  तर सबंध पंचक्रोशीत सर्व अस्पृश्यांना, वारकर्यांना व गरिब जनतेला नामदेवांनी आयोजित केलेल्या समाधी सोहळ्याचा आनंद झाला होता.

                            भारतात प्रथमच एक सवर्णाने, एका अस्पृश्याचे स्मारक, मोठा उत्सव साजरा करून बांधले होते. नामदेव जन्माने शिंपी होते. त्यांनी सर्व संतांचा मेळा जमवला होता.सर्व जातीपातीचे संत त्यांच्या मेळ्यात सामाविष्ट होते. त्यात चोखोबाराय आणि त्यांचे कुटूंब तेवढे अस्पृश्य जातीतून आलेले होते. सर्वांच्या साक्षीने नामदेवांनी कुठलाही भेदाभेद न् पाळता बडव्यांच्या नकावर टिच्चून विठ्ठल मंदिराच्या समोर चोखोबारायांचे स्मारक बांधले.आजही विठ्ठल मंदीरासमोर उभी असलेली संत चोखोबारायांची समाधी समतेचा समाज निर्माण करू पहाणाऱ्या नामदेवांची ती निषाणी आहे. जातीअंताची भुमीका घेऊन काम करणार्यांसाठी ही समाधी समतेचे प्रतिक आहे. ही समाधी सवर्ण- अस्पृश्याच्या मैत्रीचे ते प्रतिक आहे. चोखोबाराय - नामदेवांच्या मैत्रीचे ते प्रतिक आहे.सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा जातींना जोडनारा हा क्रांतीदोस्तीचा दुवा आहे.या क्रीतदास्तीला जपले पाहिजे. याद्वारे जातीअंतक प्रबोधन केले पाहिजे.  
                समाधी सोहळ्याच्या नंतरच्या काळात चोखोबारायांच्या परिवारातील त्यांची बहीण निर्मळा पुन्हा आपल्या मूळ गावी जावून राहिल्याचे निदर्शनास येते. कारण तसा संत सोयराबाईंचा अभंग सापडतो. त्यात त्यांनी चोखोबारायांची आठवण  काढत आयुष्य व्यतित करणाऱ्या निर्मळेची वेदना मांडली आहे.निर्मळाच्या रुपाने सोयराबाई म्हणतात विठ्ठला तुच सांभाळ आता लाडक्या चोखोबाला. म्हणजे हा अभंग संत चोखोबारायांची समाधी बांधल्यानंतरचा आहे.
संत सोयराबाई म्हणतात.
 पुसोनी सर्वांसी निर्मळा निघाली l येवुनी पोहंचली मेहुणपुरी ll सर्वकाळ छंद वाचे नाम गाय l आठवीत आहे चोखियांसी ll
 म्हणे विठोबा दयाळा मागणे आहे तुज | माझा भक्तराज सांभाळी तूं ll
 सोयरा म्हणे ऐसा सुखाचा सोहळा l भागी अवलीळा निर्मळाती ll 

                     यात निर्मला यांचे वर्णन सोयराबाईनी केले आहे. आशा प्रकारे एका सज्जन माणसाचा शेवट अत्यंत त्रासातून झाला. कुणालाही एकही शब्द वाकडा आणि आगाऊ न बोलणाऱ्या चोखोबारायांना पावलोपावली त्रास देण्यात आला. सदैव 'दूर हो " म्हणत हिन लेवण्यात आले. चोखोबारायांचा जरासा देखील कुणाला स्पर्शही झाला तरी त्यांनी अंगावर पाणी शिंपडून स्वताला शुद्ध करून घेतले. फक्त माणुस पणाचे हक्क अधिकार मागीतल्याबद्दल चोरीचा आळ घालून मारण्यात आले होते.त्यांचे संपूर्ण जीवन यातनेत गेले होते.
                     विचार करा चोखोबारायांसारख्या फक्त एका अस्पृश्याचे डॉक्यूमेंटेंशन झाले म्हणून सत्य इतिहासाच्या पटलावर आले.असे कितीतरी चोखोबा गावागाव मेले असतील, मारले गेले असतील. मारले गेलेले हजारो चोखोबा अजरामर झाले नाहीत, कारण त्यांच्या सहवासात आठवणींचे स्मारक बांधणारे कुणी नामदेव नव्हते.हजारो प्रतिभासंपन्न अस्पृश्य गढ्या बुरजांत तेल शेंदूर पाजुन जिवंत गाडले गेलेत. त्यांच्या नोंदीही नाहीत. चोखोबारायीच्याही आधी आणि  त्याच्या नंतरही बोलू, लिहू पहाणाऱ्या हजारो अस्पृश्यांना जागोजाग मारण्यात आले होते. जीवंत जाळण्यात आले होते. कित्तेकांना पाण्याची विहीर , जलाशय का बाटवलेस म्हणून दगडाने ठेचून मारण्यात आले होते.आशा हजारो शहिदांचे , बलिदान दिलेल्यांचे कधीही स्मारके बनली नाहीत.किंवा उच्चजातवर्गीयांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांनी माफीही मागितलेली नाही.
                      आज घडीला त्या काळाची कल्पना करताना संत नामदेवांची त्यावेळेसची कृती अत्यंत क्रांतीकारक वाटु लागते.कारण ते व्यवस्थेचा बळी गेलेल्या एका प्रतिभासंपन्न साहित्तीकाचे स्मारक उभारतात. नामदेवांनी उभारलेले स्मारक आज घडीला समतेचे, एकत्मतेचे प्रतिक म्हणून पुढे आनायला हवे. ते स्मारक साधेसुधे नसुन एका महान साहित्तीकाचे आहे. परंतू आजही नामदेव- चोखोबारायांना जानुनबुजुन डावलण्याचा प्रयत्न केला जातो.आजही जातीव्यवस्था,अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजव्यवस्थेत नामदेव- चोखोबाराय मनापासून स्विकारणारे फारच कमी आहेत.इतरांचे काहीही असो, नामदेवांनी उभारलेले संत चोखोबारायांचे स्मारक जातीअंताच्या लढाईचे मध्ययुगीन भारतातील पहिले प्रतिक म्हणून पुढे आनले पाहिजे. संत  चोखोबारायांच्या चरणावर संत  निर्मळा यांच्या शब्दांत लोटांगण -

"आनंदे ओविया तुम्हासी गईन् । जीवेभावे  ओवाळीन पायांवरी ll
सुकुमार साजिरी पाऊले गोजीरी । ते हे मिरविली विटेवरी ll कटेवरी कर धरोणी श्रीहरी । उभा भीमातीरी पंढरीये ll 
महाद्वारी चोखा तयाची बहीण l घाली लोगण उभयतां ll 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Thursday, 16 June 2022

संत चोखोबाराय चरित्र - प्रकरण १ले l संत चळवळीच्या उदयाची पार्श्वभुमी ll

संत चोखोबाराय चरित्र - प्रकरण १ ले 

ll संत चळवळीच्या उदयाची पार्श्वभुमी ll

                        भारतीय दर्शनशास्त्रातील संघर्ष आध्यात्मवादी विरुद्ध जड़वादी (भौतिकवादी ) असाच राहिलेला आहे. या संघर्षात, आहे त्याला नाही म्हणून आणि नाही त्याला आहे म्हणुन, किंवा जे आहे  ते तुम्हाला कळणार नाही म्हणून,  सातत्याने मुर्ख, बनवण्याचे काम आध्यात्माची बाजु घेणाऱ्या ब्राम्हणवाद्यांनी केले आहे. कुणी कर्तबगारी दाखवत असेल, आपले आकलन सादर करत असेल तर तुम्हाला जन्मजात हे अधिकारच नाहीत म्हणून आध्यात्मवादयांनी विषारी प्रयोग भारतात केलेले आहेत. या उलट जग आकलनीय आहे आपण जगाचा अभ्यास करू शकतो.जगाला समजुन घेवु शकतो.अनुमान प्रमाणाच्या द्वारे आपण सत्यापर्यंत पोहंचु शकतो. ही मांडणी भौतिकवाद्यांची. कुनीही जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, गुण - कर्तत्व महत्त्वाचे असतात. या तत्वांचा आग्रह भौतिकवादी धरत होते.

                    या भाजडवादी, भौतिकवादी प्रवाहामधे  लोकायत, न्याय वैशेषिक, सांख्य, पूर्व मीमांसा, बौद्ध व जैन तर आध्यात्मवादी प्रवाहात वैदीक या तत्वज्ञानाचा समावेश होतों. आध्यात्मवादयांच्या तत्त्वज्ञानातून सुरवातीला वर्णव्यवस्था आली होती आणि नंतर जातीव्यवस्था. वर्णन्यवस्थेच्या काळात आध्यात्मवादयांचा धर्म होता श्रुतींचा श्रौत धर्म तर त्यानंतर आलेल्या जातीव्यवस्थेच्या काळात आध्यात्मवादयांच्या स्मृतींचा धर्म बनला स्मार्तधर्म. या श्रौतस्मार्ध धर्माच्या आधारे अध्यात्मवाद्यांनी शोषणाच्या पिंडणाच्या आणि दमनाच्या संस्था मजबूत केल्या होत्या. या श्रौतस्मार्त धर्मीयांनाच, वैदिक धर्मी, ब्राह्मणधर्मी,वर्णाश्रमधर्मी असे म्हटले जाते. हे आध्यात्मवादी श्रौतस्मार्त धर्मी बहुसंख्य ब्राम्हणच होते. ते राजेमहाराजांना हताशी धरून, धार्मीकतेच्या नावे प्रचंड लूट करत असत. चालुक्य आणि यादवांच्या काळात तर मंदिरे स्थापन करून प्रचंड लुट करण्याचे काम हे वैदिक ब्राम्हण करत असत. 

                           महाराष्ट्रात पूर्व चालुक्यांच्या वेळेपासून ( इ.स. ५५०-७५३) ब्राह्मणशाहीने डोके वर काढायला सुरवात केली होती. त्यानंतर उत्तरेत राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य आणि यादव यांच्या कारकिर्दीत ब्राह्मणशाही मजबूत होत गेली. या सर्व  राजवटींचा ब्राम्हणी धर्माला पाठिंबा होता. त्यांच्यापैकी कित्येक राजांनी शिव आणि विष्णु यांची मंदिरे आणि तळी बांधली.त्यांच्या आमदानीत ब्राम्हणांना अग्रहार म्हणून शेते इनाम दिल्याचे कोरीव लेख उपलब्ध झालेले आहेत. शेकडो वर्षे ब्राह्मणांना जमिनी  मिळत गेल्याने, तेराव्या शतकापर्यंत ब्राम्हणांच्या मालकीच्या जमिनी सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत 

                               म्हणजे काय तर शेतकरी,कष्टकरी वर्गाने काबाड कष्ट करून पिकवलेले उत्पादन,एकीकडे राजेमहाराजे जाचक कर लावून लुटतू नेत असत, तर दुसकडे दुसरीकडे धर्मपुरोहीत धार्मीकतेच्या नावाखाली वृत्तवैकल्ये लादुन लूट करत असत. राजा रामदेवरायाच्या दरबारात चातुर्वग्य चिंतामणी ग्रंथ लिहून हेमाद्री पंडित या ब्राम्हण पंडिताने आडिच हजार व्रतवैकल्ये भोळ्या जनतेवर 'लादली होती. यादवाच्या काळात मंदिरे बांधण्याचे टैंडर हेमाद्री ब्राम्हणाकडेच होते. रामदेवरायाकडून प्रचंड पैसा उपसून हा हेमाद्रीपंडीत मंदिरे बांधत होता. त्यामुळेच तर यादवकालीन मंदिरांना हेमाडपंथीय मंदिरे म्हणतात.खरे तर, ती यादवकालीन मंदिरे होत. या वैदिक वर्णाश्रम धर्मीयांचा  सर्वोच्च सुवर्णकाळ यादवांच्या राजवटीत होता. जनता नागवली जाऊन ब्राह्मण जगवण्याचे , पोसण्याचे  काम या काळात झाले होते. ही होती तत्कालीन ब्राम्हणशाही !

                    रामदेवराय यादवाची राजवट आणि तिथुन पुढचा काळ खालून सामंतप्रथेचा मानला जातो. यादवाच्या राजवटीत पैठण, आंबेजोगाई यांसारख्या ठिकाणी जमीनी खेड़े दान दिलेले सामंत तयार झालेले होते." खालून, सामतेप्रथेचा अर्थ होतो, विकसीत झलेला जमीनदारवर्ग स्थानिक रयतेवर क्रमश: सशस्त्र हुकूमत गाजवू लागतो. या वर्गावर लष्करी सेवेची अट होती. आणि म्हणूनच दुसऱ्या कोणत्याही थराच्या मध्यस्थीविना शासक सत्तेशी प्रत्यक्ष संबंध असल्याचा त्यांचा दावा होता. वरून सामतप्रथेत राजाधिकारी करीत असलेल्या प्रत्यक्ष करवसुलीऐवजी आता छोटे मध्यस्थ करवसूली करतात आणि तिचा एक हिस्सा सामती उतरंडीत वितरित करतात.

                       त्या काळात जे सामंत तयार झाले ते ब्राम्हण आणि मिरासदार शेतकरी जातीतून. सर्वसामान्य शेतकरी जाती आणि कारगीर जातींचे  त्याकाळी आतोनात शोषण, पिडण चालू होते. व्यवसाय बंदिस्त जातीयतेमुळे कारागीर जातींच्या कारागीरित होणारी नवनिर्माती थांबलेली होती. तेच ते पारंपारीक निर्माण करून कारागीर जाती गुजारण करत असत.तर सर्वसामान्य शेतकरी अत्यल्प उत्पादन काढुन, कुटूंब जगवून शेतसारा भरण्यातच आयुष्य पणाला लावत असत. आशावेळी मुक्तीची गरज निर्माण झाली ती सर्वसामान्य शेतकरी जाती,  कारागीर जाती आणि अस्पृश्य जातींना. 

                       महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास , मध्ययुगीन भारताच्या सुरवातीला जी संतांची चळवळ उभी राहीली ती कारागीर जातींच्या नेतृत्त्वाखाली, ज्याचे नेतृत्व शिंपी जातीतील संत नामदेव यांनी केले होते.संत चळवळीचे प्रयोजन होते आध्यात्मिक मार्गाने या क्रायसिस मधे सापडलेल्या जातींचे शोषण , पिडन , दमन मांडणे. विठ्ठलाच्या दारात, वाट्याला आलेले भोग,दारिद्र्य मांडून आध्यात्मिक मार्गने मुक्ती शोधण्याचे काम संत चळवळीतून झाले. 

                       कारागीर जातींमध्ये संत भोजलिंगका हे सुतार होते, संत गोरोबाकाका कुंभार होते, नरहरी महाराज सोनार,संत जोगा महाराज तेली होते, काशिबा हे गुरव, शामा हे कासार, विसोबा खेचर लिंगायत व्यापारी होते.या कारगीर जातींच्या नेतृत्त्वाखाली उभे राहिलेल्या भक्ती चळवळीत ब्राम्हण समाजातून बहिष्कृत केले गेल्याने संत निवृत्तीनाथ , संत ज्ञानेश्वर,संत सोपान , संत मुक्ताबाई सहभागी झाले होते. अस्पृश्य जातीतून संत चोखोबाराय,संत सोयराबाई,संत कर्ममेळा , संत बंका आणि संत निर्माळा सहभागी झाले होते. या संत चळवळीत दुय्यम शेतकरी जातीतून माळी समाजातून  संत सावता महाराज सहभागी होते. ह्या संत चळवळीच्या काळात मिरासदार शेतकरी सैन्यात प्रशासनात असत तर ब्राम्हण राज्यकारभार शासन चालवायला मदत करत म्हणून सुरवातीला वारकरी संत मंडळात मिरासदार शेतकरी जातीची संख्या कमी होती. 

                        सामंतप्रथा ही अशी, उत्पादन पध्दत आहे, की जीत शासकवर्ग वा जाती कुळांच्या वा शेतकऱ्यांच्या  व कारागिरीच्या आणि भुदासाच्या वा अतिशुद्र मजुरांच्या अदास (पण निमस्वतंत्र ) श्रमीकांनी निर्मिलेला अतिरिक्त माल, महसूल कररूपाने वसूल करतात व स्वतःच्या पदसोपानानुसार वाटुन घेतात.

                     अशा पद्धतीने या शोषणाच्या सरमंजामशाहीत सर्वसामन्य वर्ग व्याकुळ झालेला होता. म्हणून ब्राम्हणशाही, सरंजामशाही विरुद्ध संतांनी विद्रोह केला आणि त्याला मोठा जनाधार मिळाला होता. 

              मध्ययुगीन भारतात ब्राम्हणी पोथ्या लिहीण्याचा सपाटा यादव काळाच्या टप्यावर मोठ्याप्रमाणावर चालू होता.त्याकाळी अनेक ब्राम्हण संस्कृतमधे लिखान करून राजे महाराजीकडून पैसे उकळत असत. ब्राम्हणी संस्कृत लिखानाला राजाश्रय होता. त्यानंतर शाहीरी पोवाडे यांनाही राजाश्रय लाभला. संतांच्या 'अभंगांना त्यांच्या अभिव्यक्तीला मात्र कुठलाही राजाश्रय त्याकाळी मिळाला नाही. तरिही संतांचा काव्यप्रकार अत्यंत लोकप्रिय झाला त्याचे कारण सर्वसामान्यांचे - दैन्य दुःख पिडन शोषण, दमन संतीनी अभंगातून मांडले होते. सर्वसामान्यांच्या  दुःखाला वाचा फोडण्याचे काम वारकरी संतांनी केले,त्यामुळे लोकाश्रयावर संत चळवळ उभी राहिली.

                          कारगीर जातींनाही त्याकाळी हिन वागणूक दिल्याचे पुरावे सापडतात. संत नामदेवांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून हकलून देण्यात आले होते. म्हणून संत नामदेव यांनी आपल्या अंतरीक मनाची सल जगजाहीर केली होती. 

कुश्चळ भुमीवरी उगवली तुळस । अपवित्र तयाशी म्हणु नये ॥ नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा ' जातीची देऊ नये ।। ज्ञानाचे, सर्वाधीक आदान प्रदान भ्रमंती केल्याने होत असे. या कारागीर जाती व्यावसायाच्या निमीत्ताने सर्वत्र फिरत असत त्यामुळे त्याचे अनुभव विश्व मोठे, व्यापक बनले होते. त्या तुलनेत शेतीत रोज राबणारा सर्वसाधारण शेतकरी ब्राम्हण सांगेल तेच सत्य मानत असे. यातून शेतकरी वर्ग माणसीक गुलाम बनला होता. 

                   आशा वेळेला व्यापक साहित्य निर्मीतीचा संकल्प संत नामदेव यांनी सोडला आणि इतर संतानी तो पूर्ण करायला मदत केली.

                        बाम्हणशाहीविरुद्ध भागवत धर्माचे बंड संतांनी  उभे केले. सामंतशाही, सरंजामशाही विरुद्ध त्यांनी आपली कैफियत विठु पाटलाकडे मांडली. 'संतांकडे सर्व प्रकारची कृतीस लागणारी साहित्यशस्त्रे होती पण त्यांना अनुकुल नव्हती भौतिकवादी ती परिस्थिती. या संत चळवळीच्या पायावर छत्रपती शिवरायांची राजकीय क्रांती झाली, पण हे पहायला पहिल्या टप्प्यातील संत मंडळ अस्तित्वात नव्हते.

                          संत चळवळीतून जातीअंताची प्रक्रीया मोठ्या प्रमाणावर झाली असती तर उत्पादन वाढीचीं निश्चीती झाली असती. कारण बुद्धाच्या वर्णीताच्या क्रांतीने देशाचे उत्पादन आठपट वाढले होते. संतांकडून जातीअंताची क्रांती होऊ शकली नाही. गावगाड्यात ' जाती ' तशाच राहिल्या. एकट्या चोखोबारायांनाच भक्तीमार्गाद्वारे बरोबरी मिळाली. बाकी अस्पृश्य तसेच राहिले ताटकळत ,जातीअंताची वाट बघत. ही संत चळवळीच्या उदयाची पार्श्वभूमी आणि मर्यादाही. 

नितीन सावंत परभणी 

9970744142


Sunday, 12 June 2022

♦मुलं म्हणजे देवाघरची फुलं !

 ♦मुलं म्हणजे देवाघरची फुलं ! 

                        मुलं म्हणजे देवाघरची फुलं , पण कुनाची मुलं ? या देशात म्हणी वाक्यप्रचार सुद्धा जातबंदिस्त आहेत.पुर्वीला दर रवीवारी माजीअस्पृश्य जातीतली किंवा भटक्या विमुक्तांचे मुलं शाळा सारवायचे.शाळा सारवायला उच्चजातीयांचा नंबर यायचा नाही.तेव्हाच सिद्ध झाले उच्चजातीयांची मुले म्हणजे देवाघरची फुले.बाकी भटके विमुक्त आदिवासी माजीअस्पृश्य गावाबाहेरचा केरकचरा .

                             दिल्लीत शाळेत जाणाऱ्या एका लहान मुस्लिम मुलाला प्रश्न विचारण्यात आला होता तुझ्या घरी शस्त्रास्त्रे आहेत का ? 
किंवा एका संघटनेने सुद्धा आवहाल दिला होता की शाळेत जाणाऱ्या लहान निरागस मुस्लिम मुलांना हेटिंगपुर्ण वागवले जाते किंवा देशभक्ती सिद्ध करायला लावण्यात येते,तशी वक्तव्ये केली जातात.. 
याही वेळी लक्षात येते मुले म्हणजे देवाघरची फुले पण मुस्लिमांची सोडुन ... 

                             bjp ने नुकतेच एका बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांला मंत्री केले आहे.तो बजरंग दलाचा व्यक्ती राज्यप्रमुख असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक ख्रिश्चन नवराबायकोला आणि त्यांची अगदी लहान लहान मुले कारमधे कोंडुन ती गाडी पेट्रोल टाकून जाळली.लहान मुले  धर्म वगैरे काहीही माहिती नसताना मारली गेली ...
तेव्हाही सिद्ध झाले मुले म्हणजे देवाघरी फुले पण ख्रिश्चनांची सोडुन ...
 
                           १.एका पारधी समाजाच्या पालांवर त्यांनी त्या जागेतून उठावे म्हणून पोलीसांचा ताफा आला होता.पारधी समाजाकडुन आम्ही उठनार नाहीत म्हणून दगडफेक चालु झाली.काही पोलीसांनी देखील प्रतीउत्तर दिले त्यात एक लहान मुल चाळ्यात दगड लागून जागीच मेले.
२.आत्ता म्याक्स महाराष्ट्र न्युज च्यायनल ने न्युज दाखवली आहे. मुंबईत पुलाखाली बसलेल्या भटक्या विमुक्तांचे पाल उठवून लावण्याचे काम पुलीस करत होते.त्या भटक्यांच्या मागे इतके जोरात पळत होते की ट्राफिक मधून आपले बाळ घेवून पळनार्या बाईचे बाळ रोडवर पडले आणि (चिरडून ?) मेले.. येथेही सिद्ध झाले मुले म्हणजे देवाघरची फुले पण पारधी वडार कैकाडी घिसाडी बेलदार सगळे भटक्यांची मुले सोडुन ... 

                         उच्चजातवर्गीयांची मुले पटापट शिकुन विदेशात गेली.त्याला कारणीभूत त्यांची गुणवत्ता नव्हे तर बालपणीपासुनच त्यांना शाळेत प्रेरणादायी वादावरण दिले गेले.त्यांना पुढील बाकड्यावर बसवुन, विशेष लक्ष देवुन, सतत संधी दिली गेली.ती मुलं परिपाठात , कला गुण गाजवण्यात सतत पुढे ठेवली गेली. तर याउलट सर्वहरा जाती जमातींना सतत हिनत्वदर्शक वागणूक देवुन मागल्या कोपऱ्यात बसवुन , मारुन पिटाळून घरी लावले गेले.

म्हणून मुले म्हणजे देवाघरची फुले असे म्हणणे जातीवादी आहे  ... 

नितीन सावंत परभणी
संस्थापक अध्यक्ष 
मानव मुक्ती मिशन 
9970744142