Saturday, 13 October 2018

ll हुसेन हुसेन धुल्ला ll

कौतिक ही उद्धव ज.शेळके यांच्या कांदबरीची नाईका.शिंपी समाजाचे ग्रामीण वऱ्हाडी जीवन या कादंबरीत चित्रीत आहे.

यात एकदा शेतीचे काम जास्तवेळ करता यावे.आपल्या लहान मुलीने त्रास देवु नये म्हणून कौतिकने आपली मुलगी यसोदी ला रोजच्यापेक्षा जास्त अफु चारला.ज्यामुळे यसोदी हालचालच करेनासी झाली म्हणून कौतिकने भीतीपोटी आकाशाकडे हात करत नवस बोल्ला होता तो असा की " देवा शादुलबुवा,मह्या यडीबांगडीच्या हातानं काही चुकभूल झाली असनं त मले उचलून ने एक्का रातीतून,पन मह्य फय अस्स कच्च तोडुन नोको नेवू ... लागनं त मी तुह्या नावानं पाच बस्तरवार करिन पुडच्या बस्तरवार पासुन "

नंतर कौतिकने मोहरमच्या दिवसी आपला दोन नंबरचा मुलगा नामाला पाच घरे मागायला लावून हा नवस फेडल्ला.तो प्रसंग असा ...

मोहरमच्या दिवशी कौतिकने नामाला आंघोळ घातली. घासून पुसुन अंग स्वच्छ केल.डोक्याला खोबरेल तेल चोपडलं.भांग पाडुन दिला.नवं कुडत घालायला सांगितले.चड्डी नेसायला लावली.नंतर महादेवाच्या मालातल्या कोऱ्या करकरीत दुपट्ट्याची झोळी कीली.ती नामाच्या खांद्यावर अडकून दिली.तांबडा पिवळा नाडा गळ्यात घातला.हतात वाटी दिली.समजावून सांगितलेलं सारं काही त्याच्या डोक्यात शिरलं की नाही,हे पहाण्यासाठी विचारु लागली.
" किती घर मांगसिन ? "
" पाच."
" अन् काय मन्सिन?"
"हुसेन हुसेन धुल्ला " नामा लाजुन म्हनाला,
पण काओ मा,पाच घरं नाई हिंडलो त ? "
" नाई बाप्पा,हिंडाच लागते.त्याच्यात कायची लाज आये.आपल्या देवाचं आफुन नाई त कोनं कराव् ..."
" पन गुजी - जानराव हासन्नाओ."
" हासू हसले त.आमच्या शादलबुवानं आमाले असंच फकीर व्हाले सांगितलं मना.मंग कोनी नाई हसत... "
मग तू आगूदर त्याईले सांगनं,का हासू नोका मनू .. "
" हो जा सांगतो."
"आगूदर सांगनं. "
" सांगतो मंतो तं." पहिल्यांदा खेकसुन बोलल्यवर मग कौतिक शांतपणे म्हनाली.
" आन् कोनी काई देल्लं त थें हाती नौको घेऊ.वाटीत घेऊन झोईत टाकजो."

खांद्यावर झोळी घातलेला नामा लाजतमुरकत शेजारची पाच घरं हिंडला.पैकी कुणी गहू, कुणी तांदूळ,कुणी जोंधळे दिले.वर एकेक- दोनदोन पैसे. शेवटी सारं घेवून नामा सुटकेच्या अनंदात घरी आला.

कौतिकानं सारं धान्य एकात दळून काढलं. खिचडाच तो. भिक्षावळीतल्या पैशांचं गुळ दुध आणलं.खिचड्याच्या पिठाचे रोडगे झाले. महादेवने गुळदुधात कुस्करले. त्याचे लाडु बांधले.शादलबुवाला त्या लाडवांचा नैवेद्य दाखवला.ऊद जाळला. अबीर वाहिला.नंतर महादेवनं शादलबुवापुढं डोकं टेकलं नामालाही टेकायला लावलं. शेवटी कौतिक आली. तिनं यसोदिला उघडं केलं. शादलबुवापुढं उपडं केलं.तिच्या नामाच्या व स्वताच्या गळ्यापोटाला अंगारा लावला. स्वता डोकं टेकुन नमस्कार करताना पुटपुटली.
" बाप्पा शादलबुवा,मले यडीबांगडीले काई नाई समजत. चुकलंमाकलं थें पोटात घाल. ह्या सर्वा तुहाच फापटपसारा आये.तारसीन त तारजा आन् मारसीन त मारत जा ! "

कौतिकचे कुटुंब म्हणजे शिप्यांचे आर्थिक सर्वहरा जातीतले शेतमजूर कुटुंबआहे.तिची संकटकालीन नेनीव  कोण्यातरी सुफी मुस्लिम संताचा धावा करते.आणि त्या मुस्लिम संतालाच ती जगाचा सर्वेसर्वा करुन टाकते.हे सर्व जग तुझाच फापटपसारा आहे. तुच सर्व निर्माण केले आणि तुच विनाश करणार अशी तिची भूमिका आहे. आमच्या या कौतिकच्या तत्वज्ञानातला सर्वेसर्वा शादलबुवा आहे.

नितीन सावंत परभणी
9970744142

Wednesday, 10 October 2018

ll काल मला अचानक सितामाय भेटली ll

नितीन सावंत परभणी
9970744142
यांची एक कविता

काल मलाही आचानक सितामाय भेटली.
अनवानी एकटीच जरा उदासच वाटली.

जवळ गेलो चौकशी केली
म्हनल माय खुशाल का ?
उदास चेहरा कोरडे ओठ म्हनली जरा बसाल का ?

काय बोलणार मी ओटा धरला लगेच..
माय जरा पटकण आवर काम हाइत लैच...

बाबा  माझ चुकलच परिक्षा उगीच दिली.
धिटपणा पाहिजे होता आतुनच मी मेली.

रामाच्या पायाने दगडाची आहिल्या झाली.
त्याच रामापाइ राजा ही सिता मातीत गेली.

कोर्ट नाय कचेरी नाय गप्प गुनान गेले वनात.
धोब्याचे ऐकणारा राम तुमच्या कसा मनात.

ना सितेची जयंती ना सितेची ऱ्याली.
रामाच्या बोभाट्यची मर्यादाचा झाली.

सुर्पनखेचे नाक रावनाची बहीण.
गुन्हा काय सांग बा मी ही जयंतीत येइल.

चप्पला देवून गाधी सांभाळ हेच बंधू प्रेम का ?
शंबुकाचा खून कारण काय कळेल का ?

कोनता न्याय कोनती निती कोनते रामराज्य .
बायका पोरे वनात हेच का रामराज्य .

माझे भाग्य खोटे माझी तिथी खोटी.
आर्यपुत्र राम त्याचीच जयंती मोठी.

सोड बा ढोंग सोड रामराज्य .
बळी तुझा आदर्ष येवू दे त्याचे राज्य .

सितामाय रडली आश्रू आले गाली.
बळीराज्याची आता तिनेच घोषणा केली.

इडा पिडा टळो दे आणि बळीचे राज्य येवू दे !!
इडा पिडा टळु दे आणि बळीचे राज्य येवू दे !!

********************************

♦️सितायण - सिताजयंती घटस्थापनेचा पहिला दिवस ll

♦️घटस्थापनेचा पहिला दिवस

     सितायण - सिताजयंती

                                सिता,सदैव दु:ख आणि यातना भोगलेले एक पौराणिक पात्र. रामायण हे रामायण नव्हे तर ते सितायण आहे.सदैव पती आज्ञेत राहिलेली रामायणाची नायिका म्हणजे सिता होय.मर्यादेची रेषा सदैव तिलाच घालून दिलेली आहे.पदोपदी परिक्षाही तिच्याच वाट्याला येते.ती चारित्र्यसंपन्न असल्याचे तिनेच सदैव सिद्ध करयाचे, कारण ती स्त्री आहे.पुरुषांना चारित्र्य संपन्नतेच्या कुठल्याही कसोट्या येथील धर्मव्यवस्थेने ठेवलेल्या नाहीत.

                            सिता म्हणजे जमीन,सिता म्हणजे भुमाता.प्राच्यविद्यापंडीत कॉ.शरद पाटील म्हणतात,अ-हल्या म्हणजे नांगरलेली जमीन म्हणून सिता ही भुकन्या ठरते.ती विदेहच्या स्त्रीराज्याची गणपुत्री आहे.तिचा काळ वंशसमाजाचा , मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेचा. साधारणतः इ.स.पु. ९०० ते १००० चा. सिता ही जिने शेतीच्या शोध लावला त्या अद्यगणमाता निऋतीच्या त्रिअंबेच्या ज्ञातीची वारसदार.आईकडून मुलिकडे जाणारे राजपद सितेकडे जावू नये म्हणून आणि ती गणराज्ञी  होऊ नये म्हणून तथा सर्वराज्य तिच्या ताब्यात जावू नये म्हणून,जनकाने सितेला पुरुषसत्ताक गणव्यवस्थेच्या रामाला बहाल केले.तिचे लग्न लावुन देवुन तिला रामाच्या गणात नांदायला पाठवले होते.कुलाचा पवित्र त्र्यंबक धनुष्य मोडुन तो मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गण जनकाने पितृसत्ताक बनवायला रामाची मदत घेतली.अशी रामायणाची कथा आहे.पितृसत्ताक पुरुषवर्चस्वाच्या राज सत्तांची सुरुवात राम करतो तर मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाजव्यवस्थेच्या राज्यांच्या मावळतीची सिता पहिली प्रतिनिधी ठरते. 

                           नवरात्रोत्सव हा निऋतीपुत्री दुर्गेचा उत्सव मानला जातो.हा सण शाक्तसंस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.भारतीय संस्कृतीतला सर्वात जुना हा सण आहे.या नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते.ही  घटस्थापना म्हणजे भुमातेचे पुजन होय. शेतीच्या शोधाचे श्रेय निऋतीला जाते.तिचे स्मरण करणारा हा सण आहे. दुर्गा ही निऋती मुलगी.तिच्याही नावे हा सण साजरा होतो.पश्चिम बंगाल मधे सर्वात मोठा नवरात्रोत्सव होतो.देशभरात सर्वत्र स्त्रीराज्ये होती.स्त्रीराज्यांत सुरु झालेले हे सण पुढे स्त्रीयांनी पिढीदरपिढीगत जीवंत ठेवले आहेत.आजही घटस्थापनेच्या पुर्वी तयारीसाठी स्त्रीया घर सारवतात.संपूर्ण घर स्वच्छ करुन घेतात. रंगरंगोट्या करतात.आणि त्यानंतर घरात घटस्थापना करतात.त्या दिवाळीसारखीच आपल्या सणाची जय्यत तयारी करतात.अनेक स्त्रीराज्यातून हा सण पिढीदरपिढीगत मार्गक्रमण करत आल्याने त्यावर अनेक परंपरांची पुटे चढलेली आहेत.रेणुकामातेच्या चरित्रातही घट किंवा पाण्याचा घडा घेवुन येतानाची कथा आहे.रेणु म्हणजे माती.ओलीताची सरकती शेती करणारी ती रेणुका.रेणुकेच्या धडावर नंतर बसवलेले डोके मातंग स्त्रीचे असल्याची एक लोककथा असल्याने नवरात्रोत्सवात मातंग स्त्रीयांची परडी भरल्याशिवाय सवर्णस्त्रीया जेवन सुद्धा करत नाहीत.देशभरात जेवढ्या मातृदेवता , स्त्रीदेवता किंवा लोकदेवता आहेत , त्या सर्व एकेकाळी जन्माला येवुन गेलेल्या शुर,धाडसी , समन्यायी , समतावादी ग्रेट स्त्रीया होत्या.त्यांची आठवण कोण्यान कोण्या मार्गाने जपून ठेवण्यासाठी त्यांच्या नावे सणवार उत्सव सुरु झाले आहेत. लिखानाची कला अवगत नसल्याने भारतीय स्त्रीयांनी आपल्या पुर्वजांचा इतिहास आकरहिन दगडांत , लोककथांत , मिथकांत जीवंत ठेवला आहे.मरीआई , पोचीमाय , यल्लम्मा, यडुआई , तुळजाई , रेणुका , सटवाई ,यमाई , मावळाई , इंद्रायणी, शितलाई , जाखाई , जोखाई , शाकंभरी, सप्तशृंगी, त्रिपुरसुंदरी, भवानी , रंडी , चंडी ,काली , दुर्गा यांसारख्या असंख्य स्त्रीदेवता पुर्वाश्रमीच्या आपल्याच पुर्वज आहेत.कुलटा , रंडकी , चंडकी , भटक भवानी , मऱ्यामाईचा गाडा यांसारख्या शिव्यांत देखील पितृसत्ताक समाजव्यवस्थेने त्यांचा नकारात्मक इतिहास जीवंत ठेवला आहे.ज्याला विधायक सकारात्मक पध्दतीने अभ्यासावे लागते.या सर्व स्त्रीया लोकदैवता कुठल्या न कुठल्या कला किंवा विद्येत पारंगत होत्या.कुनी फळे भाज्यांचा शोध लावला तर कुनी अस्त्रशस्त्रांचा , कुनी औषधोपचार करण्यात पारंगत होते तर कुनी प्रशासणात.म्हणून चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या मुख्य जनक या स्त्रीया आहेत.मध्यप्रदेशातील मुरैना येथील ६४ योगीनींचे गोलाकार सभागृह आज घडीला आपली संसदेची प्रतिकृती आहे.मोदी सरकार जानीवपुर्वक ती प्रतिकृती नष्ट करुन नवी संसद बांधत आहेत.मातृसत्ताक सामाजव्यस्थेचे मारेकरी आणि पितृसत्ताक सामजव्यवस्थेचे वाहक आजचे राज्यकर्ते आहेत.भारतीय इतिहासाचे कालचक्र विकृत आणि उलटे फिरले आहे.स्त्रीयांचे पुजन आणि सन्मान करणाऱ्या देशात पुढील काळात सतीप्रथेच्या नावाखाली जीवंत जाळण्यात आले.संपूर्ण कारभार करण्याऱ्या स्त्रीला भोगवस्तू दासी बनवण्यात आले.सृजनाचा स्त्रोत नवनिर्मीतीची प्रमुख असलेल्या स्त्रीला धर्मग्रंथ नरकाचे द्वार मानतात. कॉ शरद पाटील म्हणतात नदी स्त्री आणि अग्नी सदैव पवित्र असते.स्त्री तर दर मासिक पाळीला अधिक पवित्र होत जाते.आसाम कडे आजही स्त्रीचा पहिला मासिक पाळी दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो.परंतू ब्राम्हणी परंपरेने मात्र मासिक पाळी अपवित्र म्हणून सांगितले. विटाळ म्हणून स्त्रीला बेदखल केले गेले. वारकरी परंपरेत संत सोयराबाई यांनी विटाळाचे अभंग लिहुन तर महानुभावांच्यात चक्रधर स्वामींनी मराठीतून उपदेश करुन  विटाळ धुडकावुन लावला.

                         निऋतीच्या त्रिअंबेच्या ज्ञातीच्या शाखेतील पुढील वंशजा सिता आहे.मातीच्या गाळात कडधान्य  मिसळून त्यावर पाण्याने भरलेले गाडगे ठेवले जाते.हेच सिता-पुजन आहे.सितेच्या अागमनाचा हा सोहळा आहे.हिच सिता जयंती आहे.घट म्हणजे गाडगे.स्त्रीच्या गर्भाशयाच्या आकाराकडे बघुन गोलाकार गाडगे पवित्र मानने सुरु झाले होते.त्याला कुंभ असेही म्हणतात.कुंभाला अकार देतो तो कुंभार.घट किंवा कुंभ हे सृजनाचे नवनिर्मितीचे प्रतिक मानले जाते.लग्नसोहळ्यात देखील धान्य उगवलेले गाडगे वधूवरांच्या सोबत असते.पतीपत्नीने संसारातून विभक्त होण्यालाही घटस्फोट म्हणतात.घडा फुटने हे अशुभ आहे.म्हणून दोघांनी विभक्त होने म्हणजे घटस्फोट होय. गर्भाशयातून आई जेव्हा बाळाला जन्माला घालते त्याप्रमाणे घटातून पाझरलेल्या पाण्यावर धान्य उगवते नवनिर्मिती होते. ही कल्पना घटस्थापनेमागे आहे.सृजनाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे घटस्थापना आहे.नुकत्याच नांगरलेल्या जमीनीत पेरणी करणे म्हणजे सिता जयंती होय.सिता म्हणजे काळी जमीन.पेरणीस युक्त जमीन.

                      हजारोवर्षापासून आमच्या मायमाऊल्यांनी सितेची व्यथा एका सणाच्याद्वारे सांभाळून ठेवली.सितेचे दु:ख आपल्या उरी कवटाळून ठेवले. म्हणूनच आजही खेड्यातली मायमाऊल्या जात्यावर दळताना म्हनतात,

ऱाम म्हणून राम नाही ग सिता मातेच्या तोलाचा l
सिता मोठी हिरकणी राम हलक्या दिलाचा ll

                         सितेसारखे दुख: वेदना ,शोषन , पिडन कोण्याही स्त्रीच्या वाट्याला न येवो ! याप्रकारचा संदेश ग्रामीण महिला देत आल्या आहेत. तांत्रिक श्रृतीला गतिमान करण्याचा हाच काळ आहे .
म्हणून सिता जयंती सर्वत्र साजरी करावी.स्त्रीयांनी यात पुढाकार घ्यावा.
निऋतीच्या हस्ते शेतीच्या शोधाने सुरु होणाऱ्या घटस्थापनेच्या आणि सिता जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !..

नितीन सावंत परभणी
9970744142


Saturday, 6 October 2018

भारतीय सणवार उत्सव आणि पुरोगामी वर्गाची भूमिका

भारतीय सणवार उत्सव आणि पुरोगामी वर्गाची भूमिका 

सिंधू सभ्यतेतुन चालत आलेले सणवार उत्सव टिकवून ठेवण्यासाठी चाललेली सर्वहरा वर्गाची धडपड आणि पुरोगाम्यांची नकारात्मक नास्तिकवादी मांडणी यात नेहमी फायदा झाला तो ब्राम्हणी प्रतिगामी छावणीला.

भारतीय पुरोगामी वर्गात इंग्रजांच्या पाश्चात्त्य चिकित्सक वृत्तीने नकारात्मक नास्तिकवाद घुसवून या देशात पुरोगामी वर्गाची हेळसांड झालेली दिसून येइल.भारतीय पुरोगाम्यांनी इंग्रजांच्या प्रमाणेच या देशातील जुण्या सभ्यतेला( कल्चर ऐवजी सभ्यता) हिडीसफिडीपने हिन लेखायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात कधीच पुरोगामी चळवळी दीर्घकाळ टिकु शकली नाही.

एवढेच काय हे जुने सणवार उत्सव इतके भेदक आणि सर्वहरांची नेनीव क्याच केलेले आहेत की त्या सणवार उत्सवाच्या दिवसी तुम्ही सर्वहरांच्या हिताचा एखादा प्रोग्राम ठेवा. त्यांना फायदा मिळवून देनारी एखादी मिटिंग ठेवा. सर्वहरा वर्ग म्हनतो आम्हाला येता येनार नाही, त्यादिवशी आमचा सण आहे.आम्ही मानव मुक्ती मिशनच्या वतीने पंढरपूरला दोन दिवशीय प्रशिक्षण ठेवले होते.आर्धे लोक आले नाही.एक कांचन देवकर ताई म्हनाल्या पोळा असल्याने येता आले नाही.सण,उत्सव टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कष्टकरी,वंचित, शोषीत वर्ग कुठलाही किंमत मोजायला तयार असतो.त्यासाठी तो कर्जबाजारी होनेही स्विकारतो.काही पुरोगामी सुद्धा ते सणवार साजरे करत नसतील मात्र त्या दिवसी गोडधोड तरी करतात.म्हणजे त्यांचा त्या दिवशी त्या सभ्यतेप्रती असलेला आत्मभाव प्रगट झाल्याशिवाय राहात नाही. 

म्हणजे येथे ग्रेट कोन ठरते तुमचे पुरोगामी नास्तिकवादी नकारात्मक प्रबोधन की हे सणवारउत्सव ..

यातून आपन बाहेर फेकले जातो.पुरोगाम्यांची हार होते.आणि संस्कृतीचे ठेकेदार सत्ताधीश होतात.

यावर उपाय काय ?

भारतीय चिकित्सक वृतीने त्या सणवार उत्सवांची विधायक मांडणी करण्याची जबाबदारी आपन उचलली पाहिजे.प्रबोधन करावे पन विधायक.

जसे की हे सणवार उत्सव कसे निर्माण झाले?कसे विकास पावले? त्यावेळी लोकांच्या मेंदूंची अकलनक्षमता काय होती ?

त्या सणवार उत्सवाने काय काय नवनिर्माण केले ? नवनिर्मीतीस काय  हातभार लावला ? लोकांच्या वेदना पिडन दुर करण्यास त्या सण उत्सवांचे योगदान काय ?

आज त्याची उपयोगीता किती ? कुठला भाग नाकारावा वगैरे ?

यासाठी कॉ शरद पाटील यांच्या काही मेथोड कामी येतील.
१) अब्राम्हणी बहुप्रवाही विधायक ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पध्दती
२) जाणीव नेनीवेचे तर्कशास्त्र ..

पुरोगामी वर्गाने सगळे वेडे आणि आम्ही तेवढे शहाने ही वृत्ती सोडुन.लोकांत मिसळावे.रात्र वैऱ्याची आहे.

नितीन सावंत परभणी
प्रवक्ता मानव मुक्ती मिशन
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦