Tuesday, 9 July 2019

लऊळचा इतिहास

#लऊळ

#लऊळ गाव हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अत्यंत ऐतिहासिक गाव.ऐतिहासिक यासाठी की येथे सर्वच पंथ सांप्रदायाचा वावर राहिलेला आहे.या गावात आंबाबाईचे ठाणे आहे.या आंबाबाईची छोटेखानी उभी मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.ही आंबाबाई आपल्याला मातृसत्तेचे ठाणे,गावाचा रचना काळ सांगुन जाते.त्याचबरोबर गावात दोन खंडोबा मंदिरे आहेत.एक खंडोबा बाळे यांचा तर दुसरा जेजुरीचा खंडोबा.गावाच्या बाहेर भैरवनाथ मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर हे या गावात सिद्ध तथा नाथांचा वावर असल्याचे पुरावे देतात.सिद्धेश्वर मंदिरात आणि मरीआई मंदिरात चिंचेची झाडे आहेत.चिंचेचे झाड आणि मातृसत्तेचा, स्त्रीसत्तेचा तथा सिद्ध परंपरेचा खुप सुंदर संबंध राचिंढेरे यांनी शोधलेला आहे.
यानंतर या गावात शैव वैष्णव संघर्षाचे स्पष्ट धागेदोरे महादेव मंदिराबाहेर आपल्याला दिसतील.विष्णुच्या भग्न पावलेल्या मुर्ती येथे वैष्णवांचे उपासक राजे होऊ गेल्याचे स्पष्ट करतात.महादेव मंदिरात शिवलिंग आहेत.बाहेर अनेक वीरगळ एका रांगेत लावलेले आहेत.या गावात विरगळांची संख्या भरपूर आहे.बरेच शुरवीर युध्दात शहिद झाल्याची ही प्रतिके गावाचे वैभव किती मोठे असावे हे लक्षात अनुन देतात.

या गावात पार्श्वनाथांचे जैन मंदिर आहे.गावच्या गावगाड्यातील सर्वच जाती या गावात दिसून येतात.त्यामुळे सर्वदूरपर्यंत व्यापर करणाऱ्या जैन बांधवांनी हे पार्श्वनाथांचे मंदिर उभारले असावे किंवा पार्श्वनाथ या परिसरात येवून गेले असावेत असा अंदाज आपल्याला बांधता येइल.गावाला किल्लेवजा तटबंदी स्वरुपाची वेस आहे.वेशीच्यात आत शिरलात की शिवरायांचा पुतळा आपल्याला ग्रामपंचायती समोर दिसतो.लगेच पुढे गेलात की सुंदर नक्षीकाम केलेली मशीदही आपल्याला दिसेल.या गावात मोहरम सनाला पिराचा डोला निघतो.या डोल्यामागे दोन मराठा कुटुंबियांच्या सवार्या असतात.यात कुठालाही भेदभाव न करता सर्वजन सहभागी असतात.

अलीकडे या गावात फुलेंचाही विचार रुजतना दिसत आहे.या गावात ऱाम मंदिराच्या समोरच जोतिराव फुले यांचा पुतळा आहे.गावाचे नाव उंचीवर नेनारे सर्वात महत्वाचे प्रतिक म्हणजे #संत_कुर्मादास होत.संत कुर्मादास मुस्लिम संत असावेत कारण त्यांची समाधी कबरीच्या स्वरूपात आहेत.त्या समाधीवर हिरव्या रंगाची किनार असलेली पांढरी चादरी टाकली जाते.या संत कुर्मादास यांना भेटण्यासाठी स्वता पांडुरंग आल्याची आख्यायिका आहे.संत नामदेव,संत ज्ञानेश्वर महाराजही येथे येवून गेल्याचे गावकरी सांगतात.या गावी ४ फुटापेक्षा जास्त उंचीची विठुरायाची मुर्ती आहे.या विठुरायाच्या बाजुला रुख्मिणी नाही.माढा पंढरपूर येथील एकुलत्या एक विठ्ठलाप्रमाणे हा विठोबा स्वतंत्र उभा आहे.हाच विठुराया कुर्मादास यांना भेटायला आल्याचे सांगतात.संत कुर्मादास यांचे मंदिर गावाच्या बाहेर दोन किलोमीटरवर आरण रोडवर आहे.
या गावची लोकसंख्या ८ हजार आहे.१७ सदस्यांची बॉडी सरपंच निवडते.गावाच्या मध्यभागी मारोती मंदिर आहे.या मारोतीच्या पायाखाली कुठलातरी असुर आहे.शेंदूर लावलेली ही मारोती मुर्ती त्या पायाखालील असणाऱ्या प्रतिकामुळे मारोतीचीच आहे का हा प्रश्न निर्माण करते.गावातील लोकरे यांच्याकडे पोळ्याचा मानाचा बैल असतो.गवळी यांच्याकडे सुद्धा अदलुन बदलून हा मान जातो.
इतक्या वर्षांची जुनी परंपरा घेवून उभे असलेले हे लऊळ गाव अनेक संकटांचा सामना करत पुरातन संस्कृतीचे भग्न अवशेष दाखवत उभे आहे.
दरवर्षी या गावी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या येतात.गावकरी येणाऱ्या सर्व दिड्यांची सेवा करतात.रहाण्याची जेवणाची व्यवस्था करतात.गावाच्या ह्या मंदिराच्या आवारात व मंदिरांत ह्या दिंड्या थांबतात.संत जनाबाई दिंडीचाही एक मुक्काम या गावी असतो.विठ्ठल मंदिरात रात्री किर्तन होते आणि सकाळी दिंडी पुढे निघते.ही सर्व माहिती गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ दिनेश बागल यांनी दिली.दिनेशजींनी संपूर्ण गाव फिरुन दाखवले.त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन...

#माढा
#लऊळ
#सोलापूर

No comments:

Post a Comment