Monday, 30 August 2021

♦️आधी इंगळे मग सगळे ..

♦️आधी इंगळे मग सगळे .. 

आनंदांचे डोही आनंद तरंग l
आनंदची अंग आनंदाचे ll 
      - संत तुकोबाराय 
     
             महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला स्वातंत्र्या नंतर सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्गात लोकप्रिय करण्याचे आद्य श्रेय जाते ते विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांना.आयुष्यभर आनंद वाटणारे , आनंदात जगणारे महान कीर्तनकार म्हणजे विनोदाचार्य हरिभक्त परायण बाबासाहेब इंगळे महाराज होत. तत्वज्ञानाचे अवडंबर न माजवता सर्वसामान्यांना समजेल आशा मधूर भाषेतून आणि दैनंदिन जीवनातील दृष्टांताच्या आधारे संतांची भक्ती परंपरा इंगळे महाराजांनी घरोघर पोहंचवली.सोशल मेडिया , youtube चा जमाना नसताना त्या काळात महाराज विदाऊट प्रसिद्धी लोकप्रसिद्ध होते.सर्वसामान्य जनतेने त्यांना जिवेभावे आपले मानले होते.
संपूर्ण आयुष्यभर ते प्रफुल्लित आणि हसतमुख राहिले.आनंदी जीवनाचा सार सांगताना " काय सोबत नेनार आहात हो तुम्ही , आनंदी रहा"  हा संदेश महाराज देत असत.  
                    विनोदाचार्य हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज इंगळे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे जन्मगाव बिड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव आहे.त्यांचा जन्म ५ एप्रिल १९५४  चा.वडिलांचे नाव बाबूराव कोंडीबा इंगळे, महाराजांसह एकूण पाच भाऊ व चार बहिणींचा हा परिवार.परिवारात महाराज सर्वात मोठे होते.एकूण इंगळे परिवारात सर्वच जन अत्यंत प्रेमळ , मनमिळाऊ स्वभावाचे आहेत.विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांना तिन मुले आहेत.सर्वात मोठे ज्ञानेश्वर महाराज , दोन नंबरचे रामेश्वर महाराज आणि तिन नंबरचे सोपान महाराज इंगळे होत.ह.भ.प.सोपान महाराजांचे शिक्षण ऋषीकेशला झाले आहे.आज विनोदाचार्य ह.भ.प. बाबासाहेब इंगळे महाराजांच्या नंतर गाधीवर सोपन महाराज विराजमान आहेत.महाराजांची वारकरी सेवेची परंपरा सोपान महाराज पुढे चालवतील. 
 
         संबंध महाराष्ट्राची संतांच्या विचारांच्या द्वारे सेवा करणाऱ्या बाबासाहेब इंगळे महाराजांच्या चुलते पुतणे आणि मुलाबाळांच्या या मोठ्या परिवारात सर्वजन वेल एज्युकेटेड आणि अत्यंत प्रभल्भ विचारसरणीचे आहेत.जागतिक घडामोडींपासून ते सर्व सामान्यांच्या दैनंदिन समस्यांपर्यंतचा लेखाजोखा हा संपूर्ण परिवार ठेवतो.कुनातही अहंभाव नाही की गर्व ताठा नाही.

          महाराजांच्या किर्तनाचे वैशिष्ट्ये म्हणजे अत्यंत प्रेमळ सात्विकभाव त्यांनी निर्माण केला.ग्रामीण म्हणी , वाक्यरना , शब्दप्रयोग कसे निर्माण होत गेलेत, याचा उलगडा महाराजांनी केला.दृष्टांत आगार नावाचे पाच भागाचे पुस्तकही महाराजांनी काढले आहे. ते आपल्या किर्तनात सर्वच संतांचे प्रमाणे,दाखले देत असत.चाल उचलण्याची त्यांनी एक खास पध्दती होती.महाराजांनी गायलेला काकडा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.नामस्मरण भक्तिमार्ग , आई वडिलांची सेवा करा हा संदेशही ते स्पष्टपणे देत असत.त्यांनी कधीही कुनाचाही आपमान केला नाही, उलट कीर्तन सुरु होताना प्रत्येकाचे नाव घेवून टाळकरी , मृदंगाचार्य , बाजुला बसलेले दिग्गज यांची नावे घेवून महाराज प्रत्येकाची दखल घेत असत.त्यांनी सदैव आनंद वाटला.सर्वांच्या पदरात सुख टाकले.शब्दांच्या कोट्या आणि भाषेवर प्रचंड प्रभुत्व ही महाराजांची खास ओळख.दैनंदिन जीवनातही ते सहज विनोद करत असत. यातून लोक त्यांना भेटायला येत, निधी मानधन देत त्यातून त्यांनी भव्यदिव्य असा मोठा आश्रम गावी उभा केला आहे.
         आपल्या खास विनोदी शैलीमुळे महाराष्ट्रातील वारकरी जनतेने त्यांना विनोदाचार्य ही बदवी बहाल केली आहे .विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांच्या जीवनात अक्षय तृतियेला फार महत्व.त्यांचे लग्न अक्षय तृतियेला झाले होते.कुठल्याही कार्याची सुरुवात ते अक्षय तृतियेला करत असत.२०२१ च्या वर्षी त्यांनी अक्षय तृतियेलाच आपला देह ठेवला.निमित्य मात्र कोरोनाचे.दिनांक १४ मे २०२१ रोजी सकाळी ९:३० ते १० वाजेच्या दरम्यान महाराज सर्वांना सोडुन गेले.६८ व्या वर्षात महाराजांचे पदार्पण झाले होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचे प्रचंड नुकसान झाले आहे.वैचारिक धाक असणारे महान व्यक्तिमत्त्व निघून गेल्याने वारकरी वर्ग पोरकाच झाला म्हनावे लागेल.

      काल विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या बिड येथील आणि वडवणीच्या आश्रमाला भेट दिली. महाराजांचे आणि माझे अगदी चांगले संबंध होते.वैचारिक मांडणीला ते पाठिंबा देत असत.त्यांच्या कुटुंबातील बिड येथील घरी रामेश्वर महाराज इंगळे यांनी महाराजांच्या अनेक आठवणी सांगितल्या.महाराजांची पाहुणार करण्याची पध्दतीची आठवणही त्यांनी करुन दिली तर जन्मगावी चिंचवडगावला ह.भ.प.सोपान महाराज इंगळे यांनी संपूर्ण आश्रम फिरुन दाखला आणि दोन आडिच तास त्यांनी अत्यंत अभ्यासुपणे चर्चा केली.महाराजांची परंपरा पुढे नेण्याची त्यांची समर्पक तयारी दिसुन आली.यावेळी माझ्यासोबत ह.भ.प.गंगाधर महाराज कुरुंदकर होते. 
        महाराष्ट्रातील जनता , वारकरी, किर्तनकार वर्ग विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांच्या कार्याला सर्वजण सदैव स्मरणात ठेवतील.त्यांच्या शिकवणुकीच्या मार्गाने सर्वजन चालतील.महाराष्ट्रात आधी इंगळे मग सगळे. 
विनोदाचार्य ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन....

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

No comments:

Post a Comment