Wednesday, 22 December 2021

♦️दुजाभाव आणि भेदभाव मांडणारा संत ( जात वर्गीय ) प्रकरण ७ वे

♦️दुजाभाव आणि भेदभाव मांडणारा संत ...
प्रकरण ७ वे 

काही केशिराजा दुजे पै धरिता।
हें तो आश्चर्यता वाटे मज ll
एकासी आसन, एकासी वसन l
एक तेचि नग्न फिरताती ll
एकासी कंदान्न एकासी मिस्टान्न l 
एका न मिळे कोरान्न मागतांची ll 
एकासी वैभव  राजाची पदवी l 
एका गावेगावी भीक मांगे ll 
हाची न्याय दिसतो तुमचे की घरी l
चोखा म्हणे कर्म माझे।।
               - संत चोखोबाराय 

            संत चोखोबारायांचा जन्म सामाजिक सर्वहरा वर्गातील माजी अस्पृश्य जातीतला.त्यामुळे संत चोखोबारायांचे विचार,अभिव्यक्ती आणि तत्वज्ञान भौतिकवादी असल्याचे दिसून येईल.ज्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत आणि जे उच्च जातीय सधन घरात जन्माला आलेले आहेत.अशांना फावळ्या वेळात धर्म हवा असतो.आणि अशेच सुबत्तेत जगणारे अध्यत्मात रमतात.हेच लोक आत्मा,परात्मा,पुनर्जन्म,मोक्षाच्या मागे लागतात. आध्यात्माचे अवडंबर हेच माजवतात.याला पर्यायी विचारधारा आणि मुक्ती मार्ग संतांनी दिला.ते तसे करु शकण्याचे कारण सर्वच संत सर्वहरा होते.उच्चभ्रू नव्हते. म्हणून संताच्या दृष्टीने इहलोकीचे जीवन आणि विठ्ठल भक्तीच मोक्ष! ते ब्राम्हणी विधारचारेचा आत्मा परमात्मा मोक्ष नाकारतात.

             संत चोखोबाराय पिढीजात,मानवनिर्मित गरीब घरात जन्माला आल्याने ते अभिव्यक्त होताना सभोवतालच्या विषमतेच्या विरुद्ध प्रथम प्राधान्याने अभिव्यक्त होतात.सभोवतालच्या भौतिक जगतातला वर्गीय भेदभाव ते स्पष्ट मांडतात.जात आणि लिंगभावची विषमता दाखवनारी मांडणी त्यांनी करणे सहाजिकच आहे.परंतू ते इतरांची बाजु घेऊन वर्गीय दरीही निदर्शनास आनुन देतात. हे खऱ्या अर्थाने मोठेपणाचे आहे.

            कार्ल मार्क्स यांनी 'मार्क्सवाद'   मांडून जागतिक पटलावर वर्गसंघर्ष  अधोरेखित केला.या वर्गसंघर्षातून मार्क्स यांनी 'साम्यवादाचे'उद्दीष्ट जगासमोर ठेवले.सगळे समान असावेत,कुणावरही भेदभाव अन्याय होऊ नये,गरजेनुसार,कुवतीनुसार,पात्रतेनुसार सर्वाना समान मिळावे हे मार्क्सवाद सांगतो.मार्क्सच्या आधी सुद्धा भारतात अनेक तत्वज्ञ,महापुरुष भौतिकवादाचा आग्रह धरत असल्याची मांडणी कॉ. प्रभाकर संझगिरी यांनी चार्वाक ते मार्क्स हा ग्रंथ लिहून केलेली आहे.संझगिरी यांच्या मते मार्क्सपुर्व काळात भारतात मार्क्सवादी मांडणी चार्वाकांपासून झालेली आहे. 

           म्हणून मार्क्सपूर्व कालखंडात भौतिकवादाचा आग्रह धरत अध्यात्माला विरोध करण्यात संत चोखोबारायांचे सुद्धा नाव घ्यावे लागेल.आपल्या आजूबाजूला असलेली सामाजिक विषमता परखडपणे मांडणे हे मध्ययुगीन भारतीय सरंजामशाहित महाजीकरीचे,धारिष्ट्याचे काम आहे.हे धाडसाचे काम संत चोखोबाराय करतात. 

          जाती व्यवस्थेत अगदी हीन मानलेल्या जातीतल्या व्यक्तीने आर्थिक भेदाची दरी स्पष्टपणे मांडणे महत्वपूर्ण आहे.सरंजामशाहित आपले म्हणने राजा,सरदार,पाटील,कुलकर्णी,देशमुख यांच्या समोर मांडता येत नाही. तसे करायला गेल्यास शिरच्छेद होतो.प्राणदंडाच्या शिक्षा होतात.म्हणून संत चोखोबाराय आणि सर्वच संत आपली कैफियत विठ्ठलच्या दरबारात मांडतात.हा भेदभाव,बाजूचे अमानवीय वर्तन सर्व संत विठ्ठल या प्रतिकाला पुढे करून मांडतात.

            संत चोखोबाराय म्हणतात " हे केशवराजा तुम्ही दुजाभाव बाळगता, भेदभाव करतात याचे मला आश्चर्य वाटते.तुमच्या राज्यात आर्थिक भेदाची दरी असावी हे खेदाचे आहे. एकाला मोठे आसन आहे तर एकाला काहीच नाही.काहीजण तर नग्न फिरतात.हे केशवराजा तुमच्या राज्यात अशी भेदाची दरी का असावी? कुणाला मिष्टान्नन मिळते तर कुणाला कच्चे,अपरिपक्व अन्न खावे लागते.काहींना तर कोरभर मागूनही मिळत नाही.काहींना वैभव,संपन्नता मिळते.राजगादी मिळते तर काहींना गावोगावी भीक मागत फिरावे लागते.हाच न्याय तुमच्या राज्यात दिसतो. इतका भेदभाव देवा तुमच्या राज्यात का असावा बरे ? कर्म आमुचे अश्या राज्यात आम्ही वावरतो." 

          येथे संत चोखोबाराय 'केशवराजा' नावाच्या सरंजामदाराला सुनावत आहेत.या शासनकर्त्याला ते भेदभाव लक्षात आणून देत आहेत.याच नव्हे अनेक अभंगाच्या द्वारे मध्ययुगीन भारतातील आर्थिक भेदाची दरी चोखोबारायांनी उभी केली आहे.चोखोबारायांनी वर्णन केलेल्या सरंजामशाहित जातीव्यवस्था मुख्य आहे.लोक गरीब आहेत ते कमी उत्पादनामुळे नव्हे तर विशिष्ट जातीने कितीही काम केले तरी त्यांना योग्य मोबादलाच दिला जात नाही.महार असलेल्या चिखोबांना गावकीचे कामे वाटून दिली आहेत पण मोबदला मात्र उरलेले उष्टे अन्न या स्वरूपात आहे.अस्पृश्य आणि भटक्या जातींना श्रमाचा मोबदला जात बघून दिला जातो.ही भारतीय सरंजामशाही वर्गीय नव्हे तर  जातवार शोषण करते.म्हणून संत मंडळींनी भौतिक जगातील सुखकर जीवनाचा आग्रह धरलेला आहे.संत इहलोकीचे जीवन सुखकर बनावे यासाठीच राबतात.

           चोखोबारायांचे संपूर्ण जीवन सरंजामशाहिच्या जाचक नियमांनी बंदिस्त आहे.त्यातूनही नामदेवांच्या संत मंडळात सहभागी होऊन चोखोबा कवित्व करतात.चोखोबारायांचे भौतिक जीवन त्यांनी 'जोहार' घालणाऱ्या अनेक अभंगात मांडले आहे.

         त्यांना दररोज सकाळी उठल्याबरोबर गाव झाडावे लागते,केरकचरा उचलावा लागतो.पाटी घेऊन दारोदार उष्टे मागुन खावे लागते.दिवसा तुकडा मागून खाणे आणि रात्रीला रात्रभर जागून गाव सांभाळावा लागतो.ते वेसकरकी करतात.गावात चोऱ्या होनार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.त्यासाठी धन्याच्या आर्थात मालकाच्या पश्च्यात काठी घेऊन पाहारा द्यावा लागतो.अशाप्रकारे दिवसरात्र चाकरी करून 'चोखोबांना' भाकरी तेवढी मिळते.कधीकधी त्यांना कष्टाचा मोबदला म्हणून उष्टे , उरलेले अन्न दिले जाते.

        "बहू भूकेला झालो,तुमच्या उष्ट्यासाठी आलो. किंवा 
       चोखा म्हणे पाटी,आणली तुमच्यासाठी."
हा सरंजामशाहितला चोखोबारायांचा कामाचा मोबदला आहे.हे प्रचंड अन्यायकारक आहे.श्रमाचा मोबदला उष्टे,उरलेले देने हे जगात सर्वात हीन कृत्य आहे.हे नीच वर्तन भारतीय जातिग्रस्त सरंजामशाही आत्तापर्यंत करत होती.हे पुरावे संत चोखोबाराय यांनीच देऊन ठेवलेले आहेत.याबद्दल उच्चजातीय समाजव्यवस्थेला जराही पाझर फुटल्याचे दिसत नाही.अस्पृश्य जातींवरील हा अन्याय स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालुच होता.

         आशाप्रकारे भारतीय सारजांमशाहितली आर्थिक आणि सामाजिक भेदभावाची दरी स्पष्टपणे मांडणारा पहिला संत,संत चोखोबाराय होत.आणि हा भेद,ही विसंगती मांडून वंचित,उपेक्षित घटकाची बाजू घेण्याचे धाडस संत चोखोबाराय करतात.माजी अस्पृश्य जातीचा बुद्धिजीवी,सामाजिक सर्वहारांचा थोर बुद्धिजीवी म्हणून चोखोबारायांकडे पहावे लागेल.याच पहिल्या संताने अस्पृश्य किती काबाड कष्ट करतात हे मांडले आणि याच पहिल्या संताने कामाचा मोबदला उष्टे अन्न दिले जातो हे जगजाहीर केले.याच संताने भेदभावाची दरी साहित्यातून जागतिक पटलावर मांडली. शोषण केलेले दिसते पण पिडन कसे मोजनार ? हे पिडन दाखवून दिले ते संत चोखोबारायांनी. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment