मध्ययुगीन भारताच्या पटलावर जातीव्यस्थेने बरबटलेल्या लोकमनावर संत नामदेवांनी समतेचा, एकोप्याचा मळा फुलवायला घेतला होता. लोकांना माणुसकीचा धर्म शिकविने, भेदाभेदाच्या पलीकडे जावून एकात्म बनविणे हे नामदेवांच्या संत चळवळीचा मुख्य गाभा होता.नामदेवांच्या या कार्याचा सहवास संत चोखोबारायांच्या संपूर्ण कुटूंबाला लाभला होता.या संत नामदेवांच्या कार्याची एक शाखा संत निर्मळा आणि संत बंका महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा गावी चालवत होते. संत नामदेवांनी महाराष्ट्राच्या बोहर अनेक राज्यात आपल्या कार्याची छाप सोडलेले पुरावे आजही आपल्याला सापडतात. संत नामदेवांच्या शिकवणुकीचा सर्वात मोठा प्रभाव पंजाबवर आणि शिख धर्मावर आहे. संत नामदेवांप्रमाणे चोखोबारायांचा प्रभाव समाज मनावर पडला की नाही? संत चोखोबाराय ज्या भागातून जन्माला आले त्या परिसरातील समाजव्यवस्थने चोखोबारायांना स्विकारले की नाही? त्यांच्या जन्मभुमीत त्यांच्याप्रती लोकांच्या काय धारणा, भुमीका आहेत ? हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सवर्ण नामदेवांना कुठेही वावरणे आपली छाप टाकणे तितकेसे आवघड नाही परंतू अस्पृश्य मानलेल्या चोखोबांच्याप्रती भारतीय समाजमन कसे वागले, हे जगासमोर आले पाहीजे.
म्हणुन एकदा संत चोखोबारायांच्या जन्मभुमीला भेट देण्यासाठी अभ्यास दौराच ठेवला.स्थानिकच्या ग्रामीन लोकांच्या गाठीभेटी घेता येतील, सहज कुठेही थांबून चर्चा करता येईल या हेतूने भोकरदनहुन दोन मोटार सायकलवरून चोखोबारांचे जन्मगाव बघायला आम्ही तिन लोकं निघालो. भोकरदन तालुक्यातील बरंजाळा लोखंडे गावचे अनिल भुतेकर, बाभुळगावचे ह. भ. प. शंकर महाराज राऊत आणि मी, असे आम्ही तिघांनी खेड्यापाड्यांचा रस्ता तुडवीत देऊळगाव राजाहून मेहुणाराज गाठले. देउळगाव राजा ते देऊळगाव मही या दोन छोट्याशा शहरांच्या मधे मेहुणाराजा गावाची कमान रोडवरच लागते. कमानीवर " श्री संत चोखामेळा मेहुणाराजा जन्मस्थान " असे पांढऱ्या अक्षरात रंगवलेले आहे. आम्हाला त्या भागाची माहिती देण्यासाठी देऊळगाव महीचे शिक्षक संतोष नागरे आमच्या आधीच मेहुणराजाला येऊन दाखल झाले होते. आम्ही कमानीतून गावात शिरलो गाव सुरू व्हायच्या आलिकडेच संत चोखोबारायांचे छोटेसे मंदिर आहे. समोर छोटासा सभामंडप आणि रिकामे मैदान आहे. संत चोखोबारायांच्या मंदिराच्या मागेच अगदी लागून निर्मळा नदीचे पात्र आहे.या पात्रात संत बंका महाराज आणि संत निर्मळा महाराज या दोघांच्या समाध्या आहेत.हे दोघे संत चोखोबारायांची बहिण आणि मेहुणे होत.या नदीवर आम्ही जेव्हा पोहंचलो तेव्हा तिथे दशक्रिया विधी चालू होता. स्थानिकच्या बऱ्याच लोकांकडून नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करून आम्ही मुख्य गावाची वेस, महाद्वार पहाण्यासाठी निघालो. हे गाव अत्यंत जुणे असल्याकारणाने या गावाला सर्व बाजूनी अत्यंत सुंदर अशी दगडी तड़बंदी होती. गावकरी अभय जाधव बोलताना म्हनाले की या गावाला पुर्वी १२ दरवाजे होते. आता चार दरवाजे आस्तित्वात आहेत. २०२० - २०२१ साली या गावची लोकसंख्या तिन हजार असावी असा त्यांनी अंदाज व्यक्ता केला. मेहुणाराजा गावची पाहाणी, फोटोग्राफी करून आम्ही सर्वजन संतोष नागरे यांच्या सोबत देऊळगाव महीला प्रा. कमलेश खिल्लारे यांच्याकडे निघालो. प्रा. कमलेश खिल्लारे हे संत चोखोबारायांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. संत चोबोबारायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात सरांचा मोठा सहभाग , वाटा आहे. १४ जानेवारीला दरवर्षी मेहुणाराजा गावी चोखोबारायांच्या जन्मोत्सवाला विविध कार्यक्रम असतात.त्यात सरांचे व्याख्याब व मार्गदर्शन असते. सबंध जिल्हाभर संत चोखोबारायांचे आभ्यासक म्हणून खिल्लारे सरांचा नावलौकीक आहे. खिल्लारे सरांच्या घरी गेल्यानंतर सरांनी पुस्तक देऊन छोटासा सत्कार केला. सरांच्या घरीच त्यांनी वाचनालय उभे केले. खिल्लारे सर याच भागात अनाथ , वृद्ध आणि निराधारांसाठी कबिरालय उभे करत आहेत. खिल्लारे सरांनी संत चोखोबारायांच्या संदर्भात बराचवेळ चर्चा केली. दरवर्षी होत असलेल्या चोखामेळा जन्मोत्सवाची माहिती दिली. काही क़िस्से सांगितले.राजकारणी वर्गही आता संत चोखोबारायांच्या जन्मभुमीत रमु लागला आहे. शिवाय वैचारिक , बुद्धीजीवी वर्गातील संत चोखोबारायांच्या बद्दल एक सकारात्मक चर्चा चालु आहे.असे सरांनी सांगितले.
बरिच चर्चा करुन प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या घरून आम्ही संतोष नागरे यांच्या घरी जेवण करण्यासाठी निघालो. मी अनिल भुलेकर, ह.भ.प. शंकर महाराज राउत आदिंनी संतोष नागरे यांकडे जेवणे केली. भुसुर चर्चा झाली. आणि "आम्ही तिघेजन पुढील प्रवासाला निघालो बुलढाण्याकडे.
भारतात जातीव्यवस्था अस्पृश्यता इतकी टोकाची आहे की ती माणुसकीचे काम करणाऱ्या संतांच्या बाबतीतही पाळली जाते. इतर संतांचा जेवढा जयजयकार झाला किंवा होतो आहे.त्यातुलनेत चोखोबांच्या वाट्याला अवहेलनाच आलेली दिसते आहे.इतर संतांची नावे ठेवुन वारसा जोपासाण्याची परंपरा कायम असताना चोखोबा नाव ठेवने या आजच्या जातीग्रस्त समाजव्यवस्थेला सुट होत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय यांच्या आळंदी , देहू पेक्षा संत चोखोबारायांचे जन्मस्थाळ उपेक्षीत का ठेवले गेले असावे? सर्व संत सारखेच ना? मग मेहुणाराजा गावच्या विकासासाठी २०२० - २०२१ का उजाडावे ? काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही चोखामेळा चौक , चोखामेळा संकुल,चोखामेळा कॉलेज असे काही दिसनार नाही. जातीग्रस्त समाजमान, जातीग्रस्त राज्यव्यवस्था याला जबाबदार आहे.
एकदा मी संत गोरोबाकाकांच्या जन्मगावी तेरला गेलो होतो.तिथेही संत गोरोबाकाकांच्या मंदिर वजा वाड्याच्या बाहेर , पायरीच्या बाजूलाच छोट्याशा मंदिरात उभी केलेल्या दगडी शेळेच्या स्वरूपात चोखोबा तिष्ठत उभा होता.आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी.याही चोखोबाच्या मंदिराला रंगरंगोटी नाही.अगदी चोखामेळा मंदिर हे नाव मिटत आलेले आहे.महाराष्ट्रभर हा चोखोबा पायरीलाच उभा केला गेला. खिन्न मनाने मी चोखोबारायांचा निरोप घेतला. माझ्या समोर करुण स्वरूपात आर्त भावनेने गाणारा चोखोबा उभा राहिला.
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनl
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन ll
No comments:
Post a Comment